मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील जनजीवनाचे दाहक वर्णन करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन शहरीकरणाच्या रेटय़ाला शहराचा विकास समजला जात असल्याने सामान्य पददलितांनाही जगण्याचा अधिकार आहे की नाही अशी परिस्थिती मुंबईत झालेली दिसत असताना या विषयाची दाहकता लोकांपुढे मांडण्यासाठी ‘कोरो’ या संस्थेने ‘कोणाचे शहर? कोणाचे हक्क?’ या कार्यक्रमाचे ‘फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट’ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केला आहे. मुंबईतील झोपडपट्टय़ांमधील जन-जीवनाचे दाहक वर्णन करणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन आणि सामान्यांसाठी हक्क आहेत की नाही? या विषयाचा उहापोह करणारे चर्चासत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून काळघोडा महोत्सवाच्या निमित्ताने येथील अडोर हाऊस मधील आर्टिस्ट सेंटर येथे हे प्रदर्शन १२ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मुंबईत काही वर्षांपूर्वी ‘राईट टू पी’ मोहीमेची सुरुवात केलेल्या आणि आता ‘राईट टू सिटी’ मोहीम सुरु केलेल्या ‘कोरो’ या संस्थेने काळाघोडा येथे अनोख्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. झोपडीतील बकाल वातावरणात आयुष्य कंठणाऱ्यांच्या रोजच्या जगण्यातले विविध भाव टिपून ते त्यांचे प्रदर्शन छायाचित्रांच्या रूपाने येथे पाहता येणार आहे. बैंगनवाडी, वांद्रे, धारावी, परेल, वाशी नाका येथील झोपडीधारकांची ही छायाचित्रे आहेत. या उपक्रमाबाबत सांगताना ‘कोरो’च्या प्रतिनिधीने सांगितले की, शहरीकरण होत असताना आपल्या अवती-भोवती जगणाऱ्या छोटय़ा घटकांना जगण्याचाही अधिकार आहे हे आपण विसरून जातो. शहरीकरणाचा त्यांच्यावर पडलेला परिणाम हा खूप भीषण असून एका रात्रीत घर तुटल्याने रस्त्यावर आलेली ही मंडळी तसेच आयुष्य जगतात. मुंबईतील याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्व द्रुतगती मार्गाचे जेव्हा बांधकाम झाले तेव्हा तेथील स्थलांतरीत झालेल्यांना आज करावी लागणारी कसरत ही भयंकर आहे. याच विषयाची मांडणी करण्यासाठी काळाघोडा महोत्सवाचे निमित्त साधून आम्ही ‘फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट’च्या सहकार्याने हे छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच, शनिवारी सकाळी ११ वाजता ‘राईट टू सिटी - ब्रिजिंग द गॅप्स’ या विषयावर आर्टिस्ट सेंटर, अडोर हाऊस, काळाघोडा येथे एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना बोलते करणार मुंबईतील हे सामान्यांचे प्रश्नअखेर शहरातील लोकप्रतिनिधींशी निगडीत असल्याने तसेच सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने शहरातील काही उमेदवारांना व नेत्यांना पुढील आठवडय़ात एकाच व्यासपीठावर आणले जाणार आहे. त्यांना देखील शहरातील या अतिसामन्यांचे सध्याचे वास्तव दाखवून त्यांच्या विकासासाठी नेमके काय करणार? असे प्रश्न विचारले जाणार आहेत.