राज्य सरकारने राज्यात ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी मध्यरात्री काढण्यात आला. राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या ५ टप्प्यांच्या नियोजनानुसार राज्यातील जिल्हे, महानगर पालिकांची वर्गवारी ५ गटांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक करोना पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण ऑक्सिजन बेड्सची व्याप्ती या प्रमाणावरून एक ते पाच टप्प्यांमध्ये ही वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तेथील नियम देखील बदलणार आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये आहे. तर, ब्रेक द चेन मिशन अंतर्गत करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निर्बंधांसंबंधी आज मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने ४ जून अन्वये आदेश पारित केलेले आहेत. या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत कोविड-१९ पॉझिटिव्हिटी रेट ५.५६ टक्के असुन, ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर ३२.५१ टक्के आहे. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महागरपालिका हद्दीत पुढील प्रमाणे आदेश लागू राहातील.

Mumbai Unlock : “सध्याच्या परिस्थितीत मुंबई तिसऱ्या गटात, पण…”, महापौरांनी दिली आकडेवारी!

राज्य शासनाच्या आदेशातील निकषांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत लेवल ३ चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहातील. तसेच, महापालिकेने ब्रेक द चेन मिशन अंतर्गत यापुर्वी जारी केलले सर्व आदेश रद्द ठरतील. शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर व इतर उपाययोजना अनिवार्य राहातील. आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शवल्यास संबिधताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. हे आदेश सोमवार ७ जून पासून लागू असणार आहेत.

जाणून घ्या काय आहेत नवे नियम? –  

अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील. तसेच, इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील व शनिवार आणि रविवारी बंद राहातील. मॉल्स व सिनेमागृह बंद राहातील. हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहातील. त्यानंतर पार्सल आणि होम डिलिवरी सेवा सुरू राहील. लोकल सेवा ही सर्वसामान्यांसाठी बंद राहणार असून, केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू असणार आहे. सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरू राहातील. खासगी कार्यालयांना ५० टक्के उपस्थितीसह कामकाजाच्या दिवसात सायंकाळी ४ वाजपेर्यंत परवानगी दिली गेली आहे. बाहेर खेळण्याठी पहाटे ५ ते ९ व सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत परवानगी दिली गेली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमसाठी एकत्र जमण्यास ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. तसेच, विवाह सोहळ्यास ५० जणांची, अंत्यसंस्कारासाठी २० जण व अन्य बैठकांसाठी ५० टक्के उपस्थितीस परवानगी दिली गेली आहे.