• शहर आणि उपनगरांत  जागोजागी पाणी तुंबले

  • रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोलमडली

  • सज्जतेबाबतचे पालिकेचे दावे फोल

  • आणखी तीन दिवस जोरधारांचा इशारा

मुंबई :राज्यात आनंद घेऊन येणाऱ्या पावसाची सुरुवात मुंबईसाठी मात्र जनजीवन विस्कळित करणारी ठरली. मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई आणि उपनगरांत कहर केला. तुंबलेले रस्ते, बंद पडलेली लोकल आणि चिखलातून वाट तुडवत घर किंवा कार्यालय गाठताना मुंबईकरांना कसरत करावी लागली.

मुंबई उपनगरात बुधवारी सरासरी २२०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर, शहर भागात ४५.६ मिलीमीटर पाऊस झाला. पुढील तीन दिवस मुंबई आणि परिसरात देण्यात आलेला अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.

पहिल्याच दिवशी पावसाने मुंबई आणि परिसराला झोडपून काढले आणि पावसाळ्याला तोंड देण्यास सज्ज असल्याचे पालिकेचे दावे निकाली निघाले. बंगालच्या उपसागरात ११ जूनला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने ९ ते १२ जून दरम्यान मुंबई आणि कोकणपट्ट्यात अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा खरा ठरवत मोसमी पाऊस अपेक्षित तारखेच्या (११ जून) दोन दिवस आधीच (९ जून) मुंबईत दाखल झाला.  मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड येथेही जोरदार पावसाने हजेरी लावली.

सांताक्रुझ केंद्रात जूनमधील सरासरी पावसाची नोंद  ५०५ मिमिपर्यंत होते. सांताक्रुझ केंद्राने  बुधवारी सरासरी  २२०.६ मिलीमीटर, तर शहर भागांतील पावसाची नोंद करणाऱ्या कु लाबा केंद्राने सरासरी ४५.६ मिमि पावसाची नोंद के ली. सकाळी पावसाचा जोर इतका होता की, ८.३० ते ११.३० या के वळ तासांच्या कालावधीत सांताक्रूझ केंद्राच्या मापकावर सरासरी १०२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यात दिवसभरात १६२.६ मिलीमीटर पाऊस झाला.

मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. बृहन्मुंबई महानगरपालिके च्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांच्या नोंदीनुसार बुधवारी मुंबईतील दहा विभागांमध्ये २०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यात वडाळा एफ/उत्तर विभाग, दादर, वेसावे (वर्सोवा), अंधेरी पश्चिाम, वांद्रे पश्चिाम विभाग, मरोळ, अंधेरी, कु र्ला, घाटकोपर यांचा समावेश आहे. अवघ्या ३ ते ४ तासांमध्ये हा पाऊस कोसळत असताना, सकाळी ११.४५ वाजता समुद्रात ४.१६ मीटर उंच लाटांची भारती होती. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले.

त्रुटी उघड…

नाले सफाई, पावसाळी तयारी यांच्या घोषणा फोल असल्याचे पहिल्याच दिवशीच्या पावसाने उघड केले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सकाळीच उपनगरीय रेल्वे बंद करण्याची वेळ आली. साचलेले पाणी, खड्डे यांमुळे रस्त्यावरील वाहने तासनतास एकाच जागी उभी होती. नाल्यांच्या जवळील घरांमध्ये यंदाही पाणी शिरले. निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यवसाय होण्याच्या आशेने सुरू झालेल्या शहरातील बाजारपेठांमध्येही पाणी शिरले.

इशारा कायम…

मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा जोर पुढील दोन-तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, रायगड येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने १३ जूनपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ म्हणजे सावधानतेचा इशारा कायम आहे. गुरुवारी दुपारी १२.१७ मिनिटांनी समुद्रात भरती येणार असून यावेळी लाटांची उंची ४.२६ मीटर असेल. तसेच सायंकाळी ६.१४ वाजता ओहोटीची वेळ असून यावेळी लाटांची उंची १.९४ मीटर असेल. रायगड येथे गुरुवारीही अतिदक्षतेचा इशारा कायम आहे.

एकाच दिवसात…

मंगळवारी रात्रीपासूनच मुंबईत संततधार होती. बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये पाऊस कोसळत होता. सायंकाळी काही भागांमधील पावसाचा जोर कमी झाला. मुंबईत जून महिन्यातील पावसाच्या एकू ण सरासरीच्या ४० टक्के  पाऊस बुधवारी एकाच दिवसात उपनगरांमध्ये कोसळला.

मध्य रेल्वे १० तास ठप्प

मुंबई: दिवसभर मुसळधार पाऊस पडत असतानाही पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत सुरू राहिली, मात्र तीन ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वे मुख्य मार्ग व हार्बरवरील लोकल सेवा सुमारे दहा तास ठप्प राहिली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मध्य रेल्वे व मुंबई पालिके ने रेल्वे हद्दीतील व त्याबाहेरील के लेल्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडाला. संध्याकाळपर्यंत रेल्वेप्रवासी विविध स्थानकांत अडकून पडले होते.