आपण गावाला जाण्यास निघालो किंवा गावाहून मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो की हमखास ओळखीची मंडळी एखादी वस्तू किंवा खाऊ त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे देतात. आपण हे काम कोणताही मोबदला न घेता स्वखुशीने करतो. कारण त्यात नात्यांचा ओलावा असतो. पण जर एखादेवेळेस मित्राच्या मित्राने त्याच्या मित्राला काही तरी सामान पोहोचवण्यास सांगितले तर आपण ते काम कसे टाळता येईल याचा प्रयत्न करत असतो. या कामाचा आपल्याला काही मोबदला मिळाला तर आपण हे काम नक्कीच आनंदाने करू. कुणाच्या राहिलेल्या किंवा कुणाला भेट म्हणून द्यायच्या वस्तू आपण प्रवास करत असलेल्या मार्गावर असतील तर त्या पोहोचवण्याचे काम करून आपण पैसे कमवू शकतो. ही संधी www.beckfriends.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्वासाठी खुली झाली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा लघु उद्योजकांसाठी ही चांगली संधी असल्याचा दावा ही सेवा सुरू करणारे दीप मल्होत्रा, मयांक बसू, राहुल बसू आणि शिखा पांडे यांनी केला आहे.

आपल्याला एखादी वस्तू कुरिअर करायची असेल तर त्याला लागणारे पैसे, ती वस्तू पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, त्या वस्तूची सुरक्षा आदी प्रश्न उभे राहतात. याचबरोबर अनेकदा आपण असलेल्या ठिकाणाहून आपल्याला पहिजे त्या ठिकाणी वस्तू पोहोचवण्यासाठी कुरिअर सेवा नसते. तर अनेक वेळा वस्तूचे आकारमान मोठे असल्यामुळे कुरिअर सेवा कंपन्या ती पोहोचवण्यास नकार देतात. अशा वेळी अनेकदा वस्तू पाठविण्याचे काम अवघड होऊन जाते. मग कोणतीही वस्तू कोठेही पोहोचवणे कसे शक्य होईल याचा विचार सुरू झाला आणि मायस्पेस डॉट कॉम, रेडिफ डॉट कॉमसारख्या कंपन्यांमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव असलेल्या दीप मल्होत्रा यांनी बेक फ्रेंड्सची संकल्पना सुचली. विद्यार्थी प्रकल्पाच्या निमित्ताने किंवा उद्योजक त्यांच्या व्यवसाय वृद्धीच्या निमित्ताने देशभरात किंवा जगभरात प्रवास करत असतात. मग ही मंडळी त्या वस्तू त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी नेऊ शकतील आणि याचा मोबदला म्हणून त्यांना काही पैसे देता येतील. अशी कल्पना त्यांनी मांडली. ही कल्पना त्यांच्या सह संस्थापकांना रुचली आणि त्यांनी त्यावर पुढचे काम सुरू केले.

illegal quarry operator in panvel
पनवेलमध्ये बेकायदा दगडखाण चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

तुम्ही दिल्लीला गेलात आणि तेथे तुमचा लॅपटॉप विसरून पुन्हा मुंबईला परतलात. तर तुम्ही या संकेतस्थळावर तुमच्या लॅपटॉपची माहिती आणि तो दिल्लीत कोणत्या पत्त्यावरून आणायचा आहे व मुंबईत कोणत्या पत्त्यावर आणि किती दिवसांत पोहोचवायचा आहे हा सर्व तपशील द्यायचा. तुम्ही दिलेल्या कालावधीत दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या एखाद्या व्यक्तीने तो संदेश वाचला तर ती व्यक्ती तुमचा लॅपटॉप मुंबईत आणून देते. यात तुम्हाला तुमची वस्तू मिळते आणि तेही कुरिअरच्या खर्चापेक्षा खूप कमी खर्चात. या संकेतस्थळावर सुरक्षेचे सर्व खबरदारी घेतली जाते. संकेतस्थळावर गुगल प्लस, फेसबुक, लिंक्डइन या माध्यमातून लॉगइन करता येते. यावर लॉगइन केल्यावर संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला एखादी वस्तू न्यायची असेल किंवा मागवायची असेल तर तुमचे पॅनकार्ड, पासपोर्ट आदी कागपत्रे त्यावर अपलोड करावी लागतात. ही कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तिसऱ्या एका कंपनीकडून सर्व माहिती तपासून घेतली जाते. मगच त्या व्यक्तीला वस्तू नेण्यासाठी किंवा मागवण्यासाठी परवानगी दिली जाते. या संकल्पनेला लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि लघु उद्योजकांसाठी कोणत्याही गुंतवणुकीशिवाय पैसे कमाविण्याची ही संधी असल्याचे दीप सांगतात.

गुंतवणूक आणि उत्पन्न

हे संकेतस्थळ सुरू करण्यासाठी सध्या तरी कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवूणक करण्यात आलेली नाही. यामध्ये तात्काळ सामान पोहोचवणे या प्रकारातून कंपनी पैसे कमाविते. एखादी वस्तू ने-आण करण्यासाठी त्या वस्तूचा आकार, दोन ठिकाणांमधील अंतर आणि अपेक्षित कालावधी या आधारे पैसे आकारले जातात. हे आकारण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दरनिश्चिती होते. साधारणत: पहिल्या पाच किमी अंतरासाठी १०० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किमी अंतरासाठी १० रुपये असा दर आकारण्यात येतो. मात्र हे दर इतर कुरिअर कंपन्यांपेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी कमी असतात असा दावा दीप यांनी केला आहे.

भविष्यातील वाटचाल

ही संकल्पना संपूर्ण जगासाठी नवीन आहे. यामुळे भविष्यात ही भारतीय कंपनी ग्लोबल कंपनी म्हणून ओळखली जावी असा प्रयत्न असल्याचे दीप यांनी सांगितले.

नवउद्यमींना सल्ला

नवउद्योग सुरू करत असताना बहुतांश लोक निधी उभारणीच्या मागे जातात. मात्र आपण उभ्या केलेल्या निधीवर कंपनी चालते ती वाढत नाही. ती वाढविण्यासाठी व्यवसायाची योग्य निवड महत्त्वाची ठरते. यामुळे ग्राहकांना आज कोणती समस्या आहे आणि त्यासाठी काय उत्तर देऊ शकतो याचा जरा हटके विचार केल्यास व्यवसायाला यश नक्कीच मिळते असा सल्ला दीप देतात.