मुंबईच्या नागरी पुनर्निर्माणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या सुधारित विकास आराखड्याला राज्य शासनाने यापूर्वीच मंजूरी दिली आहे. मात्र, आता यामधील विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील फेरबदलांचीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यालाही अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील सुनियोजित विकासाला चालना मिळणार आहे.

मुंबई महानगराचे नवनिर्माण योग्य प्रकारे व्हावे यासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-२०३४ हा सर्व संबंधित घटकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या माध्यमातून राज्य शासन यावर काम करीत आहे. हा आराखडा सात महिन्यांत मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्याच्या माध्यमातून विकासाला मोठा वाव मिळणार आहे.

पालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा -२०३४ यांसह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०१४-२०३४ या वीस वर्षांचा आराखडा शासनाने ८ मे २०१८ रोजी मंजूर केला होता. हा आराखडा १ सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आला आहे. नियमावलीच्या मंजुरीतून वगळलेला भागात फेरबदल जनतेच्या हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आले. त्यावर पहिल्या टप्प्यात सुनावणी होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.