नायगाव बीडीडी चाळीतील घोटाळा

निशांत सरवणकर, मुंबई</p>

‘म्हाडा’कडून सुरू असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात नायगाव येथील बीडीडी चाळींत असलेल्या नऊ ‘न्हाणीघरां’ची मालकी पटकावणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची तसेच खातेनिहाय चौकशीची शिफारस गृहनिर्माण विभागाने केली आहे. ही नऊ न्हाणीघरे आठ चाळ अधीक्षक तसेच एका लिपिकाने लाटली होती. मात्र त्यांची मालकी नंतर रद्द करण्यात आली.

‘म्हाडा’कडून नायगावसह ना. म. जोशी मार्ग, वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. बीडीडी चाळवासीयांना ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. या चाळी मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे या प्रकल्पात घर मिळावे अशी इच्छा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चाळींची देखभाल करणाऱ्या अधीक्षकांना झाली आणि त्यांनी न्हाणीघरे ही ‘राहती घरे’ असल्याचे दाखविले. मात्र त्यांचे हे बिंग फुटले. नायगाव येथील पात्रता यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर केली तेव्हा या यादीत चाळीतील नऊ  न्हाणीघरांच्या जागी खोल्या दाखवून त्यांचे भाडेकरू म्हणून नोंद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम प्रकाशित केले. या खोल्यांच्या नावे विजेचे मीटर, भाडेपावत्याही असल्याची बाबही त्या वेळी उघड झाली होती. हा गंभीर घोटाळा उघड झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने या न्हाणीघरांचे कथित मालकी रद्द केली. मात्र संबंधित सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नव्हती.

या प्रकल्पासाठी पात्रता यादी सादर करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली होती. या यादीची शहानिशा नायगाव विभागाच्या उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण) यांनी केली. या यादीत न्हाणीघरांऐवजी निवासी घरे दाखविण्यात आली होती. तसेच ही घरे चाळीची देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील आठ अधीक्षक एका लिपिकाच्या नावे असल्याची बाब निदर्शनास आली.

नायगाव येथील न्हाणीघरे आपल्या नावावर करून घेण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ते रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट करीत बीडीडी चाळ विभागाचे संचालक प्रशांत जानबंधू यांनी गृहनिर्माण विभागाला अहवाल पाठविला होता. या अहवालानुसार संबंधित सरकारी लाभार्थीवर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस गृहनिर्माण विभागाने केली असून तसा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविला आहे.

लाभार्थी..

एस. बी. अहिरे, सी. डी. नलावडे, आर. डी. धनविजय, एम. वाय. धनेश्वर, एम. डी. गोडे, ए. ए. देसाई, ए. एम. माने, एस. आर. सोनावणे (सर्व चाळ अधीक्षक), वाय. एम. पिंजारी (संचालकांच्या कार्यालयातील लिपिक)