राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला आहे. नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांच्यासमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पर्याय होते. यांपैकी कोणत्या पक्षात जायचे हे निश्चित होत नसल्याने त्यांनी चिठ्ठ्या टाकून निर्णय घ्यायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दोन चिठ्ठ्या तयार केल्या एकात काँग्रेस आणि दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असे लिहिले. चिठ्ठी उचलल्यानंतर त्यात काँग्रेसचे नाव निघाले त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नारायण राणेंनी आपल्या पुस्तकातच याची माहिती दिल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नारायण राणे अत्यंत विश्वासू सहकारी होते. ठाकरेंवर जेव्हा अडचणी आल्या तेव्हा राणेंनी त्या सोडवल्या. मात्र, अन्याय सहन न करण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने शिवसेनेत कोंडी होऊ लागल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि कर्तुत्वाने समान्य घरातून आलेले राणे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. राणेंनी संसदेतही आपली छाप सोडल्याचे सांगत राणेंनी अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणाची प्रत आपण मागवून घेत ती वाचल्याची आठवण यावेळी शरद पवार यांनी सांगितली.

खासगी मेडिकल कॉलेज चालवणे हे काही सोपे नव्हते. मात्र राणेंनी मेडिकल कॉलेज उभे केले. हा प्रवास मांडणारं हे पुस्तक असंख्य तरुणांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदासाठी केवळ नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला, जर त्यांना पूर्ण काळ मिळाला असता तर त्यांनी आपल्या कामाची नोंद घेणे भाग पाडले असते, अशा शब्दांत शरद पवारांनी नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीचे यावेळी कौतुक केले.