रत्नागिरी जिल्हय़ातील नाणारच्या प्रकल्पाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी परवानग्या मिळवून दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच या परवानग्या द्यायला सांगितल्या. एकीकडे मुख्यमंत्र्यांना भेटून विरोध करायचा आणि दुसरीकडे कंपनीशी साटेलोटे करायचे, अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष  नारायण राणे यांनी गुरुवारी केला.

जोवर लोकांची सहमती नसेल तोवर नाणारचा सामंजस्य करार करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले. कोकणातील रिफायनरीला माझा विरोध कायम आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ग्रामस्थांचे मन वळवणार; पण कोकणी माणूस मुख्यमंत्र्यांचे ऐकणार की राणेंचे , असा सवालही त्यांनी केला. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल आता मी भविष्य काही सांगू शकत नाही. माझे भविष्य खरे ठरलेले नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगण्याचे धाडस मी करणार नाही; भाजपला सरकारची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतील, असेही सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. निवडणुकीपूर्वी भाजप सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल. अन्यथा  राजकीय पक्षांना विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाबरोबरच मुस्लीम व धनगर समाजालाही आरक्षण लागू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

नारायण राणे