महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांच्या झंझावाती दौऱ्यानंतर आता नारायण राणेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मेळाव्याच आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात नारायण राणे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकण असे दौरे केले होते. नारायण राणे यांच्या या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद लाभला होता. आता मुंबईत प्रथमच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद काय आहे, हे मुंबईकरांना दाखवून दिली जाणार आहे.

मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं लढवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे नारायण राणे यांची पुढील खेळी काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. २०१९ लोकसभा आणि विधानसभा निवडणूका तसेच होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने नारायणराव राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नारायण राणे यांचा हा मुंबईतील मेळावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.