मुंबई : भाजप आणि शिवसेनेचा युतीचा निर्णय झाल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून, रत्नागिरी-सिंधुदुर्गसह काही मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्यसभेत भाजपच्या वतीने निवडून गेलो असलो तरी खासदारकीचा राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे आणि शिवसेनेतील संबंध लक्षात घेता, युतीनंतर राणे यांना कोकणात माघार घेणे शक्य नाही. यातच राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी लोकसभा लढविण्याची तयारीही केली आहे. युतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेल्या वेळी शिवसेनेचे विनायक राऊत या मतदारसंघातून निवडून आले होते. राऊत यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. कोकणातील मतदारसंघापासून फारकत घेणे राणे यांना राजकीयदृष्टय़ा सोयीचे ठरणारे नाही. यातूनच राणे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निलेश राणे हे महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेच्या वतीने निवडणूक लढतील. याशिवाय अन्य काही मतदारसंघांमध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार रिंगणात असतील, असे राणे यांनी सांगितले.