कोकण किनारपट्टीवरील जलदुर्गांपैकी एक असलेल्या आणि इतिहासात अभेद्य अशी ओळख असलेल्या मुरूडजवळच्या अरबी समुद्रातील जंजिरा किल्ल्यावर आज कायम स्वरूपी तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले . राज्यातील १० किल्ल्यांचे रायगडच्या धर्तीवर संवर्धन केले जाणार असल्याचे यावेळी खासदार संभाजीराजे यांनी यावेळी सांगीतले. यावेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण , सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे , आमदार संजय केळकर , जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी ,पोलीस अधीक्षक अनिल पारसकर सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्यासह हजारो शिवप्रेमी मोठया संख्येने हजर होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात , भगवे झेंडे फडकवत मिरवणूक काढण्यात आली . जय भवानी , जय शिवाजीच्या गजरात आसमंत दुमदुमून गेला होता, किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकताच भारतमाताकी जय असा जयघोष करण्यात आला. पुण्याच्या सह्याद्री प्रतिष्ठानने जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकवण्याची परवानगी पुरातत्व विभागाकडे मागितली होती . परवानगी मिळाल्यानंतर आज हा कार्यक्रम घेण्यात आला . दरम्यान योग्य देखभाली आभावी जंजिरा किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. परंतु लवकरच जंजिरा किल्ल्यासह राज्यातील १० किल्ल्यांचे रायगड किल्ल्याच्या धर्तीवर संवर्धन करण्यात येणार आहे , त्याला पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिली असल्याची माहिती रायगड किल्ले विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली . रायगड किल्ला संवर्धनाचा आराखडा ६०० कोटींचा आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून कामांना सुरवातही झाली आहे. याच धर्तीवर राज्यातील केंद्र सरकारचे जे ४५ संरक्षित किल्ले आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० किल्ल्यांचे संवर्धन केलं जाणार आहे . त्यात जंजिरा , पदमदुर्ग , पन्हाळा , शिवनेरी , देवगिरी या किल्ल्यांचा समावेश आहे . पंतप्रधान कार्यालयाशी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले .