मुंबई : नैसर्गिक संकटाची पाहणी करायला गेलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांबद्दल ‘अरे-तुरे’ असे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता केंद्रीय लघु उद्योगमंत्री आणि भाजपनेते नारायण राणे यांना सुनावले. तुम्ही आपत्तीग्रस्तांना भेटायला गेला होता की अधिकाऱ्यांना असा सवालही अजित पवार यांनी केला.

कोकणात पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. वृत्तवाहिन्यांवरून ते संभाषण लोकांपर्यंत पोहोचले. त्याबाबत अजित पवार यांनी भाष्य के ले. मुख्यमंत्री एखादी पाहणी करण्यासाठी जातात त्यावेळी राजशिष्टाचाराप्रमाणे जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतात. नैसर्गिक संकटकाळात पक्षीय मतभेद, पक्षीय वाद आणायचे नसतात असेही पवार यांनी सुनावले तुम्ही जिल्हाधिकारी, मामलेदारांना बघायला आलात की नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलात असा संतप्त सवालही पवार यांनी केला.

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली तेव्हापासून मोठमोठे लोक राज्याचे प्रमुख झाले. त्यामध्ये वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला तर कधीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्या काळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते, असेही पवार यांनी सांगितले.