मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार पसरविणाऱ्या डासांच्या विरोधात ‘लढणारी’ एक फौजच्या फौज मुंबईत अवतरली आहे. तीही तब्बल ६५ हजार मैलांवरून. ही फौज आहे ‘हेलिकॉप्टरां’ची. हे अर्थातच त्यांचे बोलीभाषेतील संबोधन. त्यांचे खरे नाव – चतुर. गेल्या काही दिवसांपासून मुंबई-ठाण्याच्या काही भागांमध्ये झाडांच्या शेंडय़ांवर घिरटय़ा घालणारे हे चतुरांचे थवे दिसू लागले आहेत. ते मुंबईत आले आहेत ते मात्र केवळ जिवाची मुंबई करण्यासाठी नाही. त्याचे कारण आहे जीवनिर्मिती. प्रजननासाठी त्यांतील काही चतुर ६५ हजार मैलांचा प्रवास करून येथे आले आहेत. जगातील हे कीटकांचे सर्वाधिक अंतराचे स्थलांतर मानले जाते.

डास, अळ्या हे चतुरांचे ‘पक्वान्न’. पावसाळ्यानंतर मुंबईत डासांचा, अळ्यांचा सुकाळ असतो. या अन्नावर जगत असलेली फुलपाखरे, पतंग, चतुर यांचे प्रजनन याच काळात मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे नवरात्री, दिवाळीदरम्यान हे कीटक मोठय़ा प्रमाणावर दृष्टीस पडतात, अशी माहिती महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपसंचालक अविनाश कुबल यांनी दिली.
भारतातील एकूण संशोधनाबाबत असलेल्या उदासीनतेपोटी आजवर चतुरांवर व्यापक संशोधन झालेले नाही. मात्र गेल्याच महिन्यात केरळ येथे चतुर आणि टाचणी म्हणजे आकाराने लहान असलेल्या किटकांवर प्रथमच देशी अभ्यासकांनी चर्चा केली.
– आज ‘चतुरा’भ्यास
वॉण्डिरग ग्लायडर
’लांबी ४.५ सेमी , रुंदी – ७ ते
८.५ सेमी (पंख पसरून)
’ डोक्याचा पुढील भाग पिवळसर किंवा लाल.
’ पंख पारदर्शक. ५०० ते २००० अंडी घालतात.
’ ३८ ते ६५ दिवसांमध्ये अळ्या बाहेर पडतात.
’इतर अळ्यांप्रमाणेच त्या अत्यंत खादाड असल्याने पाण्यातील डासांची अंडी, मुंग्या, ढेकूण, एवढेच नव्हे तर बेडूकमासे आणि लहान मासेही गिळंकृत करतात.