तटरक्षक दलाच्या दमण येथील तळावरून डॉर्निअर विमानाने हेलिकॉप्टर अपेक्षित असलेल्या जागी झेप घेतली. शोधपथकाला समुद्रात हेलिकॉप्टरचे अवशेष दिसले. दरम्यानच्या काळात तटरक्षक दलाची ‘अग्रीम’ ही मुंबईच्या समुद्रातील गस्ती नौका दुर्घटनास्थळाकडे वळवण्यात आली. ती दुपारी साडेबाराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. समुद्रात इतस्तत: पसरलेले अवशेष लक्षात आल्याने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. तटरक्षक दलाच्या मुंबईत असलेल्या समुद्र प्रहरी, अचूक, सी-१५४ आणि सी – ४३४ या नौकाही बचावकार्यासाठी रवाना करण्यात आल्या. याशिवाय आणखी दोन डॉर्निअर विमानेही शोधकार्यासाठी पाठवण्यात आली. ‘अग्रीम’ नौकेने पाच मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

नौदलानेही या शोध व बचाव कार्यासाठी आयएनएस तरासा आणि आयएनएस तेग या नौका पाठवल्या. तेगवरील चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीनेही शोधकार्य करण्यात आले. याशिवाय आयएनएस शिक्रावरील सी किंग हेलिकॉप्टर, पोरबंदर येथून डॉर्निअर हेलिकॉप्टर तसेच पूर्व किनाऱ्यावर असलेल्या आयएनएस रजालीवरील पी८ आय हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. नौदल शोध मोहिमेसाठीची विशेष आयएनएस मकर ही नौकाही कारवारहून घटनास्थळी रवाना करण्यात आली.

या शोधकार्यात हाती लागलेले पाच मृतदेह ओएनजीसीच्या नौकांकडे सुपूर्द करण्यात आले व नंतर दोन हेलिकॉप्टरमधून ते मुंबईत आणले गेले. त्यातील एक हेलिकॉप्टर जुहू विमानतळावर तर दुसरे मुंबई विमानतळावर उतरले.

विमान अपघात अन्वेषण विभागाकडून या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करण्यात येईल, असे नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला.

आधीचे अपघात..

* ऑगस्ट २००३ मध्ये ओएनजीसीकडे जाणारे एमआय- १७२ हे हेलिकॉप्टर कोसळून कंपनीच्या २७ कर्मचाऱ्यांचा व वैमानिकाचा मृत्यू झाला होता.

* ४ नोव्हेंबर २०१५ – पवनहंसचे हॅलिकॉप्टर मुंबईतील समुद्रात कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. रात्री ७.३० च्या सुमारास बॉम्बे हाय परिसरात सराव करताना हा अपघात घडला होता.