ज्यादिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळी मारण्यात आली त्याच दिवशी अशी घटना होते याचा अर्थ नथुराम गोडसे याची विचारधारा जिवंत आहे आणि त्याला प्रोत्साहित करत आहेत ही दु:खद घटना आहे असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. जामियामध्ये तरुणाने पिस्तुलातून आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारासंदर्भात नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला आहे.

“गुरुवारी जामियामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली यावरुन नथुराम गोडसे याची मानसिकता जिवंत आहे हे या घटनेवरून सिद्ध होत आहे,” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. “अनुराग ठाकुर यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील गद्दारांना गोळी मारा असं वक्तव्य केलं होतं. भाजपा नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडत आहे,” असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

“काल जो तरुण पकडला गेला तो अल्पवयीन आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याला हत्यार कुणी दिलं. त्याला प्रशिक्षण कुठं मिळालं आणि ज्याप्रकारे तो पिस्तुल फिरवत होता त्याअर्थी त्याला प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्व घटनेची कसून चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.