राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी)होणाऱ्या चौकशीवरुन सध्या मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात शरद पवार स्वत:च उपस्थित राहणार आहेत. त्यांनी स्वत: आपण ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना समर्थन दिलं आहे. शरद पवार राजकारणातले भिष्म पीतामह असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, “अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे”.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि कृषी क्षेत्रात खूप काम केलं आहे. शरद पवार यांचा पक्ष आणि विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे. पण ईडीने त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे असंच मी म्हणेन. या घोटाळ्यावरुन विधानसभेत चर्चा झाली होती तेव्हा त्यांचं नाव नव्हतं. ईडी आज देवापेक्षाही मोठी झालं आहे ? देव माफ करु शकतो, पण ईडी नाही”.

दरम्यान शरद पवार दुपारी दोनच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.