आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत अनेक मोठे उद्योग सुरू होणार असून त्या माध्यमातून कोकणातील लघू-मध्यम उद्योजकांना मोठी व्यवसाय संधी मिळेल व त्यातून मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

कोकण उद्योग फोरमच्या वतीने ‘ग्रामीण उद्योगांतील संधी’ या विषयावरील दूरचित्रसंवादात देसाई बोलत होते. मुंबई व परिसरातील सुमारे २०० छोटे-मोठे उद्योजक यात सहभागी झाले होते. उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून सध्या ७० हजार उद्योग राज्यात सुरू झाले आहेत. त्याद्वारे सुमारे १६ लाख कामगार रुजू झाले आहेत. अलीकडेच राज्य शासनाने काही परदेशी कंपन्यांसोबत २४ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. यातील बरेच उद्योग हे कोकणात सुरू होणार आहेत. याद्वारे कोकणातील लघू उद्योजकांसाठी नवीन संधी खुल्या होणार आहेत. त्याचा कोकणातील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील बहुतांश हिस्सा कोकणासाठी राखीव ठेवला आहे. सेवा उद्योगासाठी दहा लाख तर मोठय़ा भांडवलासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज काढता येईल. या दोन्ही योजनांमध्ये उद्योजकांचा हिस्सा केवळ १० टक्के  असेल. बाकीचे सर्व पैसे राज्य सरकार घालणार आहे. राज्य शासनाने हमी घेतल्याने बँकांकडून विनातारण कर्ज मिळणार आहे. या योजनेत कोकणातील तरुणांना मोठी संधी आहे, अशी माहितीही देसाई यांनी दिली.

उद्योगमंत्र्यांच्या सूचना..

कोकणात कच्चा माल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. फळफळावळ मोठय़ा प्रमाणात आहे. यावर प्रक्रिया करणारे, साठवणूक करणारे उद्योग सुरू करावेत. याखेरीज समूह विकास योजना राबविली जात आहे. यासाठी दहा कोटी रुपये उपलब्ध आहेत. उद्योजकांनी एकत्र येऊन काम केल्यास फायदा होईल. अन्न प्रक्रिया उद्योगाला राज्य सरकारने चालना दिली आहे. अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग केल्यास त्यासाठी प्रशिक्षण देण्याची शासनाने सोय केली आहे. नव्या उद्योजकांसाठी एमआयडीसी तयार गाळे उपलब्ध करून देणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ातील नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असेही देसाई यांनी सांगितले.