आर्थिक पातळीवरील पिछेहाट, जागतिक पातळीवरील अस्थैर्यामुळे कोलमडणारा शेअर बाजार आणि दिवसेंदिवस खचत चाललेला रुपया अशा ‘आजारी’ वातावरणात असलेल्या भारतीय अर्थव्यस्थेला बळ देण्याचे खडतर आव्हान घेऊन रघुराम राजन यांनी बुधवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या २३व्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. सध्याचा काळ अर्थव्यवस्थेसाठी खडतर आहे, असे राजन यांनी कबूल केले. त्याचवेळी अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर आणण्यासाठी आखलेला एक आराखडाच त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. राजन यांनी बुधवारी जाहीर केलेल्या ‘प्राथमिक उपाययोजनां’नी जणू बाजारांत नवीन पहाटच उगवली. सेन्सेक्सने पुन्हा १८५००ची मजल मारली तर डॉलरच्या तुलनेत ५६ पैशांनी वधारत रुपयाही ६७.०७पर्यंत पोहोचला.      
रुपयाबद्दल..
* रुपयाच्या स्थैर्यासाठी अधिक प्रयत्नांची हमी
* चलनाच्या स्थिरतेसाठी प्रयत्न करणे हे आमचे मुख्य काम
अर्थव्यवस्थेबाबत..
* चलनफुगवटय़ावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सर्वसमावेशक विकास आणि आर्थिक स्थैर्य राखणे हे रिझव्‍‌र्ह बँकेसमोरील आव्हान
* मान्सूनच्या कृपादृष्टीमुळे अर्थव्यवस्थेला बळकटी
* अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचा ताण मर्यादित स्वरूपातच असावा.
बँकांबाबत..
* यापुढे नव्या शाखा सुरू करण्यासाठी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीची गरज नाही.
* नव्या बँक परवान्यांचे वितरण जानेवारी २०१४ मध्ये करणार.
* नव्या बँक परवान्यांसाठी आलेल्या अर्जाची छाननी करण्यासाठी बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली समिती