मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गावरील जलद आणि धिम्या मार्गावर ७५ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी लोकल सेवेची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी याबाबत घोषणा केली. दादर आणि वांद्रे स्थानकांपुढील उपनगरांतील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे तेथे फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे जमशेद यांनी स्पष्ट केले. रेल्वेवर घडणाऱ्या अपघातांचे गर्दी हे एक कारण आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल. येत्या २ ऑक्टोबरपासून या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील दहा फेऱ्या १५ डब्यांच्या असतील. या फेऱ्या जलद मार्गावर अंधेरी ते विरारदरम्यान चालवल्या जातील.पश्चिम रेल्वेवर ३५ आणि मध्य रेल्वेवर ४० फेऱ्या असतील. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १२ फेऱ्या व ट्रान्सहार्बर मार्गावर १४ फेऱ्या वाढविण्यात येतील. याचा फायदा दादर, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ आणि ठाणे मार्गावरील प्रवाशांना होणार आहे. या फेऱ्या गर्दीच्या वेळी वाढविण्यात येतील.