राज्याच्या खेडोपाडय़ात अगदी आवर्जून ऐकल्या जाणाऱ्या दूरदर्शनवरील संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातम्या बुधवार, १८ जूनपासून पुन्हा एकदा संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या बातम्या संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित केल्या जात होत्या. मात्र माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत निर्णय घेतला असून आता या बातम्या आपल्या मूळ वेळेत प्रसारित होणार आहेत.
‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या..’, एका ठरावीक संगीतानंतर दूरदर्शनवरील निवेदकांच्या आवाजातील हे शब्द कानावर पडले की, एकेकाळी लोक संध्याकाळी सात वाजताचे घडय़ाळ जुळवून घेत असत. ग्रामीण भागांप्रमाणेच शहरी भागांतही या बातम्या आवर्जून बघितल्या जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बातम्या संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित होत होत्या. त्यामुळे या बातम्या ऐकता येत नसल्याच्या तक्रारीही अनेकांनी दूरदर्शनकडे केल्या होत्या. मात्र बुधवार, १८ जूनपासून बातम्या पुन्हा एकदा संध्याकाळी सातच्या ठोक्यालाच चालू होणार आहेत.