उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी व बडतर्फ सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर याप्रकरणाची माहिती समोर येत आहे. आरोपपत्रातून मनसुख हिरेनला संपवण्याचा कट रचल्याचा खुलासा झाला आहे. मनसुख हिरेनचा खून करण्याचे काम माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना देण्यात आले होते. एनआयएने ३ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्र सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना खुनासाठी मोठी रक्कम दिली होती.

मनसुख हिरेनची हत्या करण्याचे काम घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलारशी बोलून त्याला खुनात सामील होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मिळून हिरेनचा खून केला. ४ मार्च रोजी मनसुख हिरेनचा खून झाला आणि २ मार्च रोजी हे सर्व एकत्र भेटले होते. आरोपपत्रात उघड झाले की २ मार्च रोजी वाझेने एक बैठक बोलवली होती. ज्यामध्ये सुनील माने आणि दुसरा पोलीस कर्मचारी प्रदीप शर्मा दोघेही उपस्थित होते. मनसुख हिरेन आधीच तिथे होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार, दोघांना हिरेन कसा दिसतो हे जाणून घेण्यासाठी आणि योजनेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वाझेने ही बैठक बोलावली होती. त्याच दिवशी संध्याकाळी सचिन वाझे पुन्हा एकदा अंधेरीच्या चकला येथे सुनील माने यांना भेटले आणि त्यांना बुकी नरेश गौर यांनी दिलेले सिम कार्ड आणि मोबाईल हँडसेट दिले.

मनसुख हिरेनच्या हत्येचे काम प्रदीप शर्मा यांना देण्यात आले होते असे आरोपपत्रात म्हटले आहे. या कामासाठी प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलारशी संपर्क साधला आणि पैशाच्या बदल्यात खून करू शकतो का असे विचारले होते. तेव्हा शेलारने हो म्हटले होते.

हत्येसाठी केली होती मोठी तयारी

प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलारकडे तवेरा गाडीचा नोंदणी क्रमांक मागितला, जी गाडी मनसुख हत्येसाठी वापरली जाणार होती. सुनील माने यांना सचिन वाझेने दिलेल्या सिमकार्डमध्ये काही समस्या होती. त्यामुळे सुनील माने ३ मार्च रोजी सचिन वाझेच्या कार्यालयात गेले आणि दिलेल्या सिमकार्ड मोबाईल फोन परत केला. त्यानंतर वाझे त्याच दिवशी पुन्हा मानेला चकला येथे भेटले. एक नवीन मोबाईल आणि सिम दिला आणि सांगितले की तावडेचे नाव घेऊन मनसुखला फोन करा आणि त्याला ठाण्यात यायला सांगा. तेथे मनसुखला संतोष शेलारकडे सोपवले जाईल.

४ मार्चला केली हत्या

४ मार्च रोजी संध्याकाळी मानेने मालाड येथील पोलीस अधिकारी असल्याचे भासवत हिरेनला फोन केला. यानंतर हिरेन त्याला भेटायला तयार झाला. मानेने मनसुखला शेलाकडे सोपवले. शेलार मनीष सोनी, सतीश मोथुकरी आणि आनंद जाधव या तिघांसह तवेरा गाडीच त्यांची वाट पाहत होते. या लोकांनी हिरेनला गाडीमध्येच ठार केले आणि मृतदेह खाडीत फेकून दिला.

आरोपपत्रात म्हटले आहे की ३ मार्च रोजी वाझे पुन्हा एकदा शर्मा यांना भेटले आणि त्यांना पैशांनी भरलेली बॅग दिली, ज्यात ५०० रुपयांच्या नोटा होत्या. पैसे घेतल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी शेलारला फोन करून लाल तवेराची व्यवस्था करण्यास सांगितले. हिरेनला मारण्यासाठी आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शर्मा यांना या वाहनाचा वापर करायचा होता.