नायगाव येथे सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामासाठी शुक्रवार ते रविवार वसई रोड ते भाईंदर दरम्यान जलद मार्गावर दोन्ही दिशेने रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात रात्री ११.५५ ते पहाटे ६.२५ पर्यंत काही उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून सर्व वाहतूक १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
शुक्रवार ८ आणि शनिवार ९ मार्च रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ५.२५ वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात वसई-बोरिवली (रा. ११.२०), बोरिवली-विरार (रा. ११.५५), १५ डब्यांची बोरिवली-विरार (पहाटे ४.४०) आणि १५ डब्यांची विरार-अंधेरी (पहाटे ५.३०) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटहून शुक्रवारी रात्री ९.५७ वाजता वसई रोडसाठी सुटणारी गाडी विरापर्यंत नेण्यात येणार आहे.
शनिवार ९ आणि रविवार १० मार्च रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ६.२५ वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात वसई-अंधेरी (रा. १०.१०), अंधेरी-विरार (रा. ११.१५), वसई-बोरिवली (रा. ११.२०) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. अंधेरीहून वसईसाठी शनिवारी रात्री ९.५० वाजता सुटणारी तसेच चर्चगेटहून रात्री ९.५७ वाजता वसई रोडसाठी सुटणारी गाडी विरापर्यंत नेण्यात येणार आहे.
रविवार १० आणि सोमवार ११ मार्च रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत ब्लॉक करण्यात येणार आहे.
या काळात वसई-बोरिवली (रा. ११.२०) आणि बोरिवली-विरार (रा. ११.५५) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. चर्चगेटहून रविवारी रात्री ९.५७ वाजता वसई रोडसाठी सुटणारी गाडी विरापर्यंत नेण्यात येणार आहे.

१७ मार्चला रेल्वेचा ब्लॉक नाही
बारावीच्या परीक्षेमुळे रविवार, १७ मार्च रोजी रेल्वेच्या अभियांत्रिकी कामाला सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तीनही उपनगरी रेल्वेवर त्या दिवशी कोणताही ब्लॉक करण्यात येणार नाही. रविवार, १७ मार्च रोजी बारावीच्या विज्ञान शाखेचा जीवशास्त्राचा पेपर आहे. त्या दिवशी रेल्वेने ब्लॉक ठेवू नये अशा आशयाचे पत्र राज्य शालान्त मंडळाने रेल्वे प्रशासनास पाठविले होते. या पत्रावर विचार होऊन १७ मार्च रोजी ब्लॉक करण्यात येणार नसल्याचे रेल्वेकडून मंडळास कळविण्यात आले आहे.