अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे भाजपाचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दसरा मेळव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणे कुटुंबियांवर केलेल्या टीकेनंतर संतापलेल्या नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणाची मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणाची चौकशी बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर नितेश यांनी या प्रकरणाबद्दलचे काही प्रश्न उपस्थित करत हे प्रकरण बंद करण्यात आल्यानंतर पुन्हा या प्रकरणात पुरावे सापडल्यास पोलीस अडचणीत येतील असा इशाराही राणे यांनी दिला आहे.

राणे यांनी तीन ट्विट करुन या प्रकरणासंदर्भात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “पोलिसांना पुरावे सापडले नाही म्हणून दिशा सालियान प्रकरण बंद केलं जाणार आहे?, असं असेल तर दोन वेळा तपास अधिकारी का बदलण्यात आले? रोहन पाटील अद्याप फरार का आहे?, त्या रात्रीनंतर तिच्या इमारतीचा वॉचमन कुठे गायब आहे? तिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप का आलेला नाही?, त्या रात्रीचे मोबाईल टॉवर लोकेशन तपासण्यात आले का? तपास करण्यापूर्वीच हे प्रकरण बंद करण्याची घाई पोलिसांना का आहे? यामध्ये नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे. आम्ही याकडे खूप बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. नंतर पुरावे सापडल्यास पोलिसांची नाचक्की होणार नाही अशी अपेक्षा आहे,” असं राणे यांनी पहिल्या दोन ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तिसऱ्या ट्विटमध्ये राणे यांनी, “फॉरेन्सिक लॅबमधील एका व्यक्तीने मला फॉरेन्सिक रिपोर्टमधील माहिती दाखवली होती. त्यावरुन हे आत्महत्येचे प्रकरण नाही हे स्पष्ट होत आहे मग पोलिसांना हे प्रकरण बंद करण्याची एवढी घाई का आहे?,” असा प्रश्न उपस्थित केला आहे.


राज्य सरकारवर व शिवसेनेवर टीका करणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून समाचार घेतला होता. त्यावेेळी आपल्या भाषणात उद्धव यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी ट्विट आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केेले होते. “दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी याच प्रकरणावरुन नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत.