माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी विनाशर्त माफीनामा दिल्याने त्यांच्याविरुद्ध केलेला बदनामीचा दावा आपण मागे घेत असल्याचे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या वतीने बुधवारी महानगरदंडाधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
तिवारी यांच्याविरुद्ध गडकरी यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची दखल घेत कारवाईच्या प्रक्रियेचे आदेश महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या पाश्र्वभूमीवर तिवारी यांनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयासमोर हजर होत जामिनासाठी अर्ज केला होता व न्यायालयानेही तो मंजूर केला होता.  बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली असता तिवारी यांनी विनाशर्त माफी मागणारे पत्र आपल्याला लिहिले असल्याचे गडकरी यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. हे पत्र न्यायालयात सादर करीत आपण तिवारी यांच्याविरुद्धचा दावा मागे घेत असल्याचे गडकरी यांच्या वतीने सांगण्यात आले व दावा मागे घेण्यासाठी अर्जही करण्यात आला.
तिवारी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते असताना गडकरी यांचे ‘आदर्श’मध्ये बेनामी फ्लॅट असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर गडकरींनी तिवारींविरुद्ध डिसेंबर २०१० मध्ये दंडाधिकाऱ्यांकडे अब्रुनुकसानीची तक्रार केली होती.