उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचा दावा

गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परप्रांतीय हटाओ मोहिमेमागे काँग्रेस पक्षाचा हात असून त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात सरकारला यश आले आहे. राज्य सोडून जाणारे परप्रांतीय पुन्हा राज्यात परतत असल्याचा दावा गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शनिवारी येथे केला. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘सह्य़ाद्री’ अतिथिगृहात माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, गुजरातमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येत असून स्थानिकांसोबतच बाहेरील राज्यातून येणाऱ्या हजारो लोकांना राज्यात रोजगार मिळत आहे. त्यातून राज्याच्या विकासात भर पडत असून केवळ राज्याला बदनाम करण्यासाठी काँग्रेसच्या एका आमदाराने परप्रांतीय हटाओ मोहीम सुरू करीत उत्तर प्रदेश, बिहारमधील लोकांना मारहाण करण्यास सरुवात केली. त्यामुळे काही लोक परतही गेले. मात्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करीत हल्लेखोरांवर कारवाई केली असून आता  परिस्थिती शांत झाली आहे. एवढेच नव्हे तर राज्य सोडून गेलेले परप्रांतीय आता परतत आहेत, असा दावाही पटेल यांनी केला. विकासाचे गुजरात प्रारूप फसल्याचा विरोधकांचा आरोपही चुकीचा असून गुंतवणुकीत आजही आम्ही अव्वल आहोत. कृषी उत्पदनात वाढ झाली असून उद्योगधंदेही वाढले आहेत. रोजगार उपलब्ध होत असल्यानेच गुजरातमध्ये अन्य राज्यातून लोक मोठय़ा प्रमाणात येत असल्याचा दावाही त्यांनी केला.

देशातील एकता आणि अखंडतेचे शिल्पकार असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुजरातमधील नर्मदा जिल्हास्थित केवडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारण्यात आला आहे. १८२ मीटर इतका जगातील हा सर्वात उंच पुतळा असून, यामुळे देशातील पर्यटन उद्योगाला गती मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण होणार असून त्यासाठी सर्व राज्यातील मुख्यमंत्री, नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. १५ हजार पर्यटक एका दिवशी भेट देऊ  शकतील एवढी याची क्षमता आहे. सरदार संग्रहालय, आठ किलोमीटर लांबीची फ्लॉवर व्हॅली या स्थळाचे आकर्षण असून येथे सरदार पटेल यांची जीवनगाथा लेझर शोद्वारे दाखविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सरदार पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही महान असून शिवाजी महाराजांचे मुंबईतील स्मारकही मोठे व्हावे अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.