मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळतोय. अशात २५ जून पासून या लोकलच्या तिकिटांचे दर वाढणार अशी बातमी आली होती. मात्र या भाडेवाढीला सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला.

डिसेंबरमध्ये मुंबईत देशातली पहिली एसी लोकल सुरु झाली आणि मुंबईकरांचा प्रवास गारेगार झाला. ही लोकल सुरुवातीला चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान चालवण्यात आली. त्यानंतर लोकलचा विरारपर्यंत विस्तार करण्यात आला. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकिट जीएसटीसह ६० रुपये तर कमाल तिकिट २०५ रुपये ठेवण्यात आले होते. २५ जून पासून भाडेवाढ होणार होती, मात्र ही भाडेवाढ आणखी ६ महिन्यांसाठी टळली आहे.

मुंबईकर सध्या सवलतीच्या दरात एसी लोकलचा प्रवास करत आहेत. प्रवाशांची मते जाणून घेतली असता तूर्तास भाडेवाढ करू नये अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे सहा महिने भाडेवाढ होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.