वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाय योजावेच लागतील. यावर टाळेबंदी हा उपाय नाही हे मान्य, पण त्याला पर्याय हवा आहे. दोन दिवसांत विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊ. पर्यायी मार्ग न सापडल्यास लोकांचा जीव वाचवण्यासाठी नाईलाजाने टाळेबंदी करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

करोना संसर्गाचे प्रमाण थोडे कमी झाल्यावर आपण गाफील राहिलो, पण त्याने पुन्हा डोके वर काढले. उपनगरी रेल्वे, उपाहारगृहांमध्ये गर्दी होत आहे. घरगुती कार्यक्रमांनाही मोठी गर्दी होत आहे. परिणामी, करोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ती अशीच वाढत राहिली तर रुग्णालये तुडुंब ड्टारतील. त्यामुळे अनावश्यक गर्दी आता टाळावीच लागेल, असे आवाहन राज्यातील जनतेशी समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी केले. टाळेबंदीची लगेचच घोषणा करत नाही. पण दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि टाळेबंदीला पर्याय सापडला नाही तर टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

वर्षांच्या सुरुवातीला करोनाचे संकट नियंत्रणात आले असे वाटत होते. या काळात राज्याला पुढे नेणारा-अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. पण त्यानंतर काही लोकांनी शिमगा सुरू के ला. त्याला योग्यवेळी उत्तर देईन. आता करोना संकट महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. करोना संकट आता आक्रोळविक्रोळ स्वरुपात परतले आहे. विषाणूचे नवे रूप आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात पावणे चार लाख रुग्णांसाठी व्यवस्था सज्ज आहे. रुग्ण वाढ झपाटय़ाने होत आहे. महिनाभरात मुंबईतील परिस्थिती बिघडली. दररोज सुमारे आठ हजार रुग्ण आढळत आहेत. राज्यातील रुग्णसंख्या सध्या साडेतीन लाखांपेक्षा अधिक आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात विलगीकरण कक्षांतील ६२ टक्के  खाटा ड्टारल्या आहेत. अतिदक्षता विभागातील २० हजार ५१९ खाटांपैकी ४८ टक्के  खाटा ड्टारल्या आहेत. आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत, पण डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी कु ठून आणायचे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

लशीमुळे संसर्गाची तीव्रता घटते!

लस घेतली म्हणजे करोना संसर्ग होणार नाही असे नव्हे. लशीमुळे करोना संसर्गाची तीव्रता कमी होते. त्यामुळे मुखपट्टी, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे या प्रतिबंधात्मक उपायांना पर्याय नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. गुरुवारी एका दिवसात ३ लाख लोकांचे लसीकरण केले. आपल्याला ती क्षमता ६ लाखांपर्यंत न्यायची आहे. त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणाले.

..तरीही चाचण्या वाढवणारच

मुंबईत रोज ५० हजार चाचण्या करत आहोत. राज्यात १ लाख ८२ हजार चाचण्या करण्यात येत आहेत. ते प्रमाण दररोज २.५० लाखांपर्यंत न्यायचे आहे. त्यात ७० टक्के  आरटीपीसीआर चाचण्या असतील. आपल्याला लपवाछपवी करायची नाही. इतर राज्यांत रुग्ण का वाढत नाहीत असे विचारले जाते. मला सर्वाचा जीव प्रिय आहे. खलनायक ठरवले तरी चाचण्या वाढवणारच, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

नाव न घेता फटकारले

टाळेबंदीच्या संदर्भात किंवा मुखपट्टी लावण्यावरून मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्योगपती आनंद महिंद्र, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींना चांगलेच सुनावले. टाळेबंदीऐवजी आरोग्य सुविधा वाढवा असा सल्ला एका उद्योगपतीने दिला. टाळेबंदी खपवून घेणार नाही, लोकांची रोजीरोटी बुडेल त्याचे काय, अशी वक्तव्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आदी दाखले देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना फटकारले. आरोग्य सुविधा वाढवण्याचे काम सुरूच आहे, पण मग तुम्ही रोज ५० डॉक्टर, परिचारिका आणून देणार का, असा सवाल करत त्या सूचनेतील फोलपणा ठाकरे यांनी दाखवून दिला. तर रोजी रोटी वाचवायचीच आहे, पण त्याआधी लोकांचा जीव वाचवायचा आहे. लोकांच्या जिवावर बेतणारे राजकारण करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. तसेच काही जण मुखपट्टी वापरत नाहीत, ती वापरणार नाही, असे सांगतात याबद्दल नाराजी व्यक्त करत असे बोलण्यात तुम्हाला खूप शूरपणा वाटतो का, टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

सोमवारपासून कठोर निर्बंध?

टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी येत्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू के ले जातील. सरसकट टाळेबंदी लागू के ली जाणार नाही, असे संके त सरकारीमधील उच्चपदस्थांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडून सायंकाळी झालेल्या बैठकीत आढावा घेतला. काँग्रेसने सरसकट टाळेबंदीला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचाही विरोध आहे. यामुळे सरसकट टाळेबंदी लागू के ली जाणार नाही. त्याऐवजी दृश्य स्वरूपात दिसतील, असे कठोर निर्बंध लागू केले जाणार आहेत. हे निर्बंध कोणते असतील यावर बैठकीत खल झाला. शनिवारीही बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वे बहुधा रविवारी जाहीर केली जातील.

लोकांच्या मदतीची आमची पुन्हा तयारी : फडणवीस

मुंबई : होय, आम्ही गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची आमची पुन्हा तयारी आहे, असे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. ब्रिटन, जर्मनी कुठेही जा, सर्वानीच जनतेच्या मदतीसाठी काही ना काही केले आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. विरोधक वा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन केले तर करोना रोखण्यात अधिक मदत होईल, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.

पुण्यात कठोर निर्बंध

  • पुणे : करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आज, शनिवारपासून (३ एप्रिल) सात दिवस पुणे शहरासह जिल्ह्य़ात सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.
  • पुढील सात दिवस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाडय़ा बंद ठेवण्यात येणार आहेत. उपाहारगृहे, रेस्टॉरंट्स, मद्यालये, चित्रपटगृहे, धार्मिक स्थळेही बंद राहणार आहेत. मात्र, उपाहारगृहांमधून पार्सल सेवा रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
  • सात दिवस राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असून विवाह सोहळ्यासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीचे बंधन आहे.
  • शाळा, महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, दहावी, बारावी आणि राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत.

कृपया राजकारण करू नका..

करोनाची परिस्थिती सर्वत्र आहे. जगात अमेरिका, ब्रिटन, ब्राझिल आदी देशांत टाळेबंदी वा तत्सम उपाय के ले जात आहेत. त्यामुळे आता कृपा करून यात राजकारण आणूू नका, असे आवाहन ठाकरे यांनी विरोधकांना केले. रस्त्यावर उतरायचे तर लोकांना मदत करण्यास उतरा. चाचण्या करणाऱ्यांना मदत करा. हातात हात घालून ही लढाई लढावी लागणार आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आज तज्ज्ञांशी चर्चा

संभाव्य निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, शनिवारी विविध विषयांतील तज्ज्ञ, जाणकार आणि विश्लेषकांशी सल्लामसलत करणार आहेत.

लसीकरण वाढवण्यासाठी  केंद्राची मदत

गुरुवारी एका दिवसात ३ लाख लोकांचे लसीकरण केले. आपल्याला ती क्षमता ६ लाखांपर्यंत न्यायची आहे. त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

४७,८२७ नवे रुग्ण

आता टाळेबंदीची घोषणा करत नाही. पण दोन दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली नाही, पर्याय सापडला नाही तर टाळेबंदी करावी लागेल.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री