होळीतील गैरप्रसंग टाळण्यासाठी पोलिसांची व्यूहरचना मुंबई : ‘बुरा ना मानो..होली है’, असे म्हणत बेभानपणे रंगांची उधळण करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने चोख व्यूहरचना केली आहे. एखाद्याची इच्छा नसताना त्याच्यावर रंग उधळणाऱ्या किंवा रंगमिश्रित पाण्याचे फुगे भिरकावणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयाने तसे स्पष्ट आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. होळी, रंगपंचमीचे निमित्त करून पादचाऱ्यांवर विशेषत: महिलांवर चोरून रंग, फुगे भिरकावले जातात. धावत्या लोकलमध्ये फुग्याचा फटका बसून महिला जखमी झाल्याचे प्रकार याआधीही घडले आहेत. उत्साहाच्या भरात नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, दोन गटांमधील वाद, महिलांची छेडछाड आदी प्रश्न न उद्भवता सण सुरळीत पार पडावा, यासाठी पोलीस आयुक्तालयाने आदेश जारी केले. या आदेशांनुसार व्यक्ती ओळखीची असो, नसो तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर रंग उधळणे हा गुन्हा ठरतो. अशा कृतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १८८ नुसार संबंधितांवर गुन्हे नोंदवा, अशा सूचना शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना जारी करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी धार्मिक भावना दुखावतील अशी कोणतीही कृती करू नये. घोषणाबाजी, शेरेबाजी, टिप्पणी करू नये, गाणी गाऊ नयेत. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचे, नैतिकतेचे भान राखून सण साजरा करा, अशा सूचना नागरिकांना द्याव्यात, असेही आयुक्तालयाने पोलीस ठाण्यांना बजावले आहे. सणांचे निमित्त करून गुन्हे करणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिली.