पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचा अपेक्षा भंग केला आहे. जनतेने धर्माचं रक्षण करण्यासाठी नव्हे तर विकासासाठी सरकार निवडून दिले आहे असे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार म्हणाला. सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने भ्रष्टचार कमी करू असे सांगितले होते. पण सत्तेत आल्यावर भ्रष्ट लोकांनाच त्यांनी पक्षात प्रवेश दिला असे कन्हैया कुमार म्हणाला. नरेंद्र मोदी राफेल कराराची आकडेवारी का जाहीर करत नाही ? असा सवाल त्याने केला.

नोटाबंदी नंतर लघु उद्योग डबघाईला आले पण अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला भरघोस नफा मिळाला असे कन्हैया म्हणाला. इंग्रजांच्या तुकड्यावर जगणारे आता अंबानींच्या तुकड्यावर जगत आहेत असे तो म्हणाला. समाजात दारिद्रय रेषेखालील लोकांना मिळणाऱ्या सुविधा हा आरक्षणाचा भाग आहे. अशा उपाययोजना करून समाजातील विषमता नष्ट केली पाहिजे. बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेमुळे मराठा किंवा अन्य समाजाकडून आरक्षणाची मागणी होते आहे असे कन्हैयाने सांगितले.

समाज अजूनही हॅशटॅगच्या मानसिकतेत अडकला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर एखाद्यानं टीका करणे योग्य आहे पण निधनाच्या दिवशीच असे करणे चुकीचे पण टीका करणाऱ्यांना मारहाण करणे देखील चुकीचेच आहे असे कन्हैया म्हणाला. घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे. सेन्सॉरशिप आधीही होती पण आता वाढली आहे. गौरी लांकेश यांची हत्या करणारे आणि आमचा विरोध करणारे एकच आहेत असे कन्हैया कुमार मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाला.

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींकडून दाभोलकरांच्या आरोपींची माहिती मिळाली. कर्नाटक पोलिसांनी आरोपींना अटक करण्याआधी घाईगडबडीत महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही कारवाई पाच वर्षांपूर्वी का नाही झाली? असा सवाल कन्हैया कुमारने विचारला.