वाकोल्यामध्ये एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याचे निमित्त करून वाकोला विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त वसंत ढोबळे यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात शनिवारी बदली करण्यात आली. या बदलीमुळे विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वाकोला परिसरात अनधिकृत धंदे करणारे फेरीवाले, तसेच बारमालक खूष झाले असले तरी कायदा व शिस्तीचा बडगा उगारला तर बदलीचा दणका बसू शकतो असे मत पोलीस दलातून व्यक्त होताना दिसते. मात्र आता ढोवळेंचा मुंबईवरच ‘कंट्रोल’ राहील अशी प्रतिक्रियाही काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
समाजसेवा शाखेमध्ये सहाय्यक आयुक्त असताना ढोबळे यांच्या करवाईमुळे ब्युटीपार्लरच्या नावाखाली अवैध धंदे करणाऱ्यांना प्रचंड जरब बसली होती. मात्र ढोबळे हॉकी स्टिक घेऊन मारतात अशी हाकाटी करून त्यांची तेथून काही महिन्यांपूर्वी वाकोला येथे बदली करण्यात आली होती. वाकोला विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अनधिकृत फेरीवाले, बारवाले तसेच अवैध धंद्यांच्या विरोधात ढोबळे यांनी जोरदार मोहीम राबवली. पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांना नियमानुसार टोपली घेऊन बसण्यास, तसेच पदपथ स्वच्छ ठोवण्यास त्यांनी भाग पाडले. पदपथ हा लोकांना चालण्यासाठी आहे याची जाणीव प्रथमच ढोबळे यांच्या कारवाईमुळे सांताक्रूझ, विलेपार्ले आणि वाकोल्यातील लोकांना झाली. सांताक्रूझ येथे मदन जयस्वाल हा फेरीवाल्याला ढोबळे यांनी बोलावले असता आपले सामान घेऊन पळून जाऊ लागला आणि रस्त्यातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. या संधीचा फायदा घेऊन फेरीवाले संघटना व काही राजकीय नेत्यांनी ढोबळे यांची बदली करण्याची मागणी लावून धरली. खासदार प्रिया दत्त आणि आमदार कृपाशंकर सिंग हे घटनास्थळी पोहोचले. प्रिया दत्त यांनी ढोबळेंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. फेरीवाल्यांनी वाकोला पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सदानंद दाते घटनास्थळी पोहोचले. ढोबळेंनी मारहाण केल्यामुळे फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याचा आरोपही करण्यात आला. दाते यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आणि चौकशी होण्यापूर्वीच शनिवारी ढोबळे यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रणकक्षमध्ये बदली करण्यात आली.
ढोबळे यांच्या बदलीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मात्र नियंत्रणकक्षमध्ये ढोबळे यांना दूरध्वानी केल्यास संपूर्ण मुंबईत कारवाई होऊ शकेल, असे मतही लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता मुंबईवरच ढोबळेंचा ‘कंट्रोल’ आल्याची मार्मित टिप्पणी एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली. अनधिकृत धंद्यांना आळा घालणाऱ्या अधिकाऱ्यांची अशा पद्धतीने बदली करण्यात येत असेल तर चांगली कामे करण्यास कोण पुढे येईल, असा सवाल काही पोलीस अधिकाऱ्यांनीच उपस्थित केला.