महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलिसांनी एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल,अशी एसएमएस सेवा शनिवारी सुरू केली आहे. त्यामुळे कुठल्याही रिक्षा किंवा टॅक्सीत बसण्यापूर्वी  ९९६९७७७८८८ या क्रमांकावर लघुसंदेश (एसएमएस) करून त्या टॅक्सीचा क्रमांक द्यायचा.. मग ते वाहन कुठे गेले, कुठल्या दिशेने चालले आहे, कोणाचे आहे, अशी सर्व माहिती पोलिसांकडे जमा होईल.
इस्थर अनुह्या तरुणीच्या हत्या प्रकरणानंतर धडा घेतलेल्या पोलिसांनी ‘एकटीने प्रवास सुरक्षित प्रवास’ ही योजना सुरू केली आहे. मुंबई महानगर टेलिफोन निगम मर्यादितच्यासहयोगाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले की, हा विशेष भ्रमणध्वनी क्रमांक आहे.  ज्याचा एक स्वतंत्र सव्‍‌र्हर आहे. जेव्हा एखादी महिला कुठल्याही वाहनात बसेल तेव्हा त्या वाहनाचा क्रमांक या भ्रमणध्वनी क्रमांकावर ‘एमएमएस’ ने पाठवायचा आहे.
विशेष सॉफ्टवेअरमुळे ही महिला त्या वाहनात कुठून बसली, हे वाहन कुठे चालले आहे, कुठे थांबले त्याची सर्व माहिती देऊशकणार आहे. ही माहिती सर्व माहिती एक वर्षभर साठवून ठेवली जाणार असून एक कोटी क्रमांक साठविण्याची क्षमता यात आहे.
वाहनचालकांनी त्यांच्या वाहनाचा क्रमांक दर्शनी भागात ठळकपणे लिहिणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईत सहा रेल्वे टर्मिनस असून टॅक्सी चालकांना यापुढे फलाटावर प्रवासी घेण्यासाठी जाता येणार नाही. तसेच वाहतूक पोलिसही येथे तैनात केले जाणार आहेत. गुन्हा घडण्यापूर्वी घेतलेली खबरदारी म्हणून अशाप्रकारची ही पहिलीच सेवा आहे.