उत्तर मुंबईत पालिकेचा प्रयोग; एकाच वेळी १५ जणांचा ताप मोजणे शक्य

मुंबई : उत्तर मुंबईतील करोनाबाधितांची रुग्णवाढ कमी करण्यासाठी पालिकेने घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत एकाच वेळी लांबून १५ लोकांचा ताप मोजता येईल, असे अत्याधुनिक हेल्मेट वापरण्यात येत आहे. झोपडपट्टी भागात रहिवाशांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी या हेल्मेटचा वापर पालिकेसाठी खूप उपयोगी ठरत आहे.

उत्तर मुंबईत दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड या भागांत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत असल्यामुळे पालिका आयुक्तांनी या भागात मिशन झिरो कृती आराखडय़ांतर्गत घरोघरी जाऊन लोकांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. या कार्यक्रमांतर्गत पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करून रहिवाशांची तपासणी केली जात आहे. मात्र झोपडपट्टीसारख्या जास्त घनता असलेल्या भागात जाऊन प्रत्येकाची तपासणी करणे अनेकदा जिकिरीचे होते. अशा परिस्थितीत पालिकेने आता खास अत्याधुनिक असे हेल्मेट वापरण्याचा प्रयोग केला आहे.

भारतीय जैन संघटनेच्या मदतीने उत्तर मुंबईत या हेल्मेटच्या साहाय्याने रहिवाशांचा ताप मोजला जात आहे. संस्थेचा एक तज्ज्ञ व्यक्ती हे हेल्मेट घालून वस्त्यांमध्ये जातो, त्याच्याबरोबर पालिकेच्या आरोग्य सेविका असतात. अनेकदा लोक घराबाहेर येत नाहीत, तपासणी करायला घाबरतात अशा वेळी आरोग्य सेविका लोकांना घरातून बाहेर बोलावतात किं वा दरवाजा उघडायला सांगतात व लांबूनच या हेल्मेटने ताप मोजता येतो, अशी माहिती मालाडमधील साहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. या हेल्मेटमुळे एका मिनिटात २०० व्यक्तींचा ताप मोजता येतो. थर्मल गनने ताप मोजण्यासाठी वेळ लागतो. हा वेळही वाचतो. तसेच लांबूनच ताप मोजता येत असल्याने संसर्गाचा धोका टळतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत दहिसर, मालाड, कांदिवलीतील वीस हजार लोकांची तपासणी केली असल्याची माहिती संस्थेच्या डॉक्टरांनी दिली.

हेल्मेट काम कसे करते?

या हेल्मेटमध्ये सेन्सर असून तो हातावरील एका विशिष्ट घडय़ाळाशी जोडलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान सामान्यांपेक्षा जास्त आहे असे वाटले तर त्याला वेगळे करून त्याची तपासणी केली जाते.