दिवाळीनंतर करोना रुग्ण वाढण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढवली. मात्र चाचण्यांची संख्या वाढवूनही तुलनेने बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच मुंबईत सध्या ११,६९७ रुग्ण उपचाराधीन असून त्यापैकी ८,०७२ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर लक्षणे असलेल्या २,८८४ रुग्णांपैकी केवळ ७४१ रुग्ण गंभीर आहेत.
दिवाळीनंतर पालिकेने प्रति दिन १४ ते १५ हजारांवर असलेली चाचण्यांची संख्या वाढवून १८ ते १९ हजारांपर्यंत नेली आहे. बुधवारपासून परराज्यातून आलेल्या प्रवाशांच्या चाचण्या रेल्वे स्थानकावर केल्या जात आहेत. बुधवारी १९ हजार चाचण्या करण्यात आल्या. आठ महिन्यांतील एका दिवसातील ही चाचण्यांची सर्वाधिक संख्या आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. आतापर्यंत १८ लाख ३६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या १३,९२२ एकूण खाटांपैकी ८८४० खाटा रिक्त आहेत. अतिदक्षता विभागाच्या १९२६ खाटापैकी ७८६ खाटा रिक्त आहेत. अतिसंक्रमित क्षेत्र असलेल्या वरळी, प्रभादेवीत या आठवडय़ात एकही प्रतिबंधित क्षेत्र नाही.
मृत्युदरातही घट
दिवाळीनंतर करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी आठवडय़ाचा मृत्युदर अडीच टक्क्यांवरून दोन टक्क्यापर्यंत खाली आला आहे.
दिवाळीमुळे लोकांचा बाजारपेठेतील वावर वाढला होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खुल्या झाल्याने शहरात बाहेरून येणाऱ्यांची ये-जा देखील वाढली. परिणामी शहरातील दरदिवशीच्या रुग्णांची संख्या पाचशेवरून पुन्हा एकदा हजाराच्या घरात पोहोचली आहे. बुधवारी आणि गुरुवारी अनुक्रमे शहरात १११४ आणि ११४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. शहरात सध्या सर्वाधिक रुग्ण हे बोरिवली (आर मध्य), कांदिवली (आर दक्षिण), भांडुप (एस), मुलुंड(टी), ग्रॅण्टरोड (डी),अंधेरी (के पश्चिम) या विभागात आहेत. ऑक्टोबरमध्ये दर आठवडय़ाच मृत्युदर हा जवळपास तीन ते चार टक्क्यांदरम्यान होता.नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात तर दोन टक्क्यापर्यंत (१.९७ टक्के) खाली घसरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2020 12:19 am