सुशांत मोरे-जयेश सामंत

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सीएसएमटी ते पनवेलदरम्यान आखण्यात आलेला उन्नत जलद मार्ग बारगळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुरेशी स्पष्टता येत नसल्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईत नव्याने उभ्या राहात असलेल्या विमानतळादरम्यान आखण्यात आलेल्या जलद मेट्रो मार्गाचा नव्याने आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) खासगी कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवावा यासाठी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावावर कोणताही निर्णय झालेला नाही.

सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर धिम्या लोकलच धावतात. त्यामुळे लोकल प्रवास ७५ मिनिटांचा होतो. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते खोपोली मार्गावरील जलद लोकल चालवून हाच प्रवास ४५ मिनिटांपर्यंत आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने मध्यंतरी घेतला होता. त्यानुसार मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाला २००९-१० मध्ये रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली. या प्रकल्पात ११ स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. उन्नत मार्ग बांधताना केवळ ३० टक्के भाग सध्याच्या हार्बर मार्गावरून जाईल, तर प्रकल्पातील अन्य मार्गासाठी जमीन संपादन करावी, असेही ठरविण्यात आले. सुरुवातीला प्रकल्पावर काम मध्य रेल्वेकडून होत असतानाच तो कालांतराने मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडे सोपवण्यात आला. त्याचा पुन्हा नवीन आराखडा बनवला गेला. कालांतराने मुंबई, ठाणे हद्दीत मेट्रो प्रकल्प होत असल्याने या प्रकल्पाचा फायदा होईल का, असा सवाल उपस्थित होत होता. त्यामुळे या प्रकल्पाचा फेरआढावा घेण्यात आला.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका खासगी बडय़ा कंपनीने रुची दाखवली आहे. तसे पत्रही एमआरव्हीसीला दिले. मुंबई महानगरात एमआरव्हीसीला एमयूटीपीचे प्रकल्प राबविताना राज्य सरकारकडूनही निधी प्राप्त होतो. त्यामुळे उन्नत प्रकल्पासाठीराज्य सरकारशीही चर्चा करणे बंधनकारक असल्याने त्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पाठवण्यात आला. त्याबाबत सरकारकडून अद्यापही विचार झालेला नाही.