राज्यातील १,५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी केली.

राज्यातील १९ जिल्ह्य़ांतील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; परंतु करोनामुळे १७ मार्च रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला.

३१ जानेवारीपर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने आता १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी २५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारीच्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.