कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी सरकारी पातळीवर बैठकांचा सिलासिला सुरू असला तरी कांद्याचे  भाव सामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी आणखी १५-२० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यतवा वर्तविण्यात येत आहे. कांदा उत्पादक शेजारील राज्यांतील कांदा बाजारात विलंबाने आल्याने ही भाववाढ झाली आहे. मात्र आता कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांदा बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे लवकरच भाव खाली येण्याची अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, कांद्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकाने दिले आहेत.
 राज्यात दरवर्षी साधारणत: २४ लाख मेट्रीक टन कांद्याचे उत्पादन होते. यंदाच्या रब्बी हंगामातही तेवढय़ा कांद्याचे उत्पादन झाले आहे. मात्र शेजारील राज्यांकडून कांद्याची मागणी वाढल्याने राज्यातील बाजारपेठेत यंदा कांदा कमी आला. जुलै माहिन्यात पाच लाख टनऐवजी तीन लाख टनच कांदा स्थानिक बाजारात आला असून जून माहिन्यातही एक लाख टन कमी कांद्याची आवक झाली. शेतकऱ्यांच्या चाळींमध्ये मोठय़ाप्रमाणात कांदा असून गेल्या काही दिवसात कांद्याचे दर सतत वाढत असल्यामुळे आणखी भाववाढ होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांची बाजारात कांदा आणलेला नाही. त्याचा परिणाम ही भाववाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ही भाववाढ आटोक्यात आणण्यासाठी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि या विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर गोयल यांनी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत दरवाढ आटोक्यात आणण्यावर चर्चा झाली. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात यंदा कांद्याचे पीक उशिरा आल्याने त्या राज्यातील व्यापाऱ्यांनी नाशिक बाजारपेठेतून कांदा मोठय़ाप्रमाणात खरेदी केला. त्यामुळे ही भाववाढ झाली असली तरी आता दोन्ही राज्यात नवा कांदा आलेला आहे. राज्यातही सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून नवा कांदा येण्यास सुरूवात होईल, त्यामुळे भाव घसरतील, असा दावा या खात्याचे सचिव सुधीर गोयल यांनी केला. ही भाववाढ रोखण्यासाठी केंद्रानेही हस्तक्षेप करण्याच्या हालाचाली सुरू केल्या आहेत.

नवी दिल्ली:कांद्याचे कडाडलेले भाव पुढील महिन्यात कमी होतील अशी अपेक्षा आहे.प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे भाव किलोला ८० रुपयांपर्यंत भडकले आहेत. उत्पादन कमी असल्याने कांद्याचे भाव वाढल्याचे केंद्रीय अन्नमंत्री के.व्ही.थॉमस यांनी स्पष्ट केले. भारतातमधील भाव जादा पाहता कांदा निर्यात होत नाही. भाववाढ रोखण्यासाठी किमान निर्यातदर निश्चित करणे तसेच अन्य पर्यायांचा विचार सुरु आहे.