मुंबई : संकटासोबत संधी निर्माण होत असते. तशी कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा. महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. हिमतीमुळेच करोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जाऊ, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणाबाहेरही उद्योगांचे विके ंद्रीकरण व्हावे, असा सरकारचा प्रयत्न असल्याचेही देसाई यांनी सांगितले. ‘ऑल इंडिया सारस्वत कल्चरल’ संघटनेच्या ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील वेबसंवादात देसाई बोलत होते. मुंबई, पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणात मोठी गुंतवणूक झाली आहे. करोनामुळे या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी शासनाने उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणुकदारांनी शासनाचे धोरण समजून घ्यावे. जिल्ह्य़ात आपले प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले. करोनोच्या साथीमुळे पुढे काय होणार, असा प्रश्न भेडसावत आहे. परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभाग सज्ज आहे. उद्योग विभागाने विविध धोरणे आणि योजना आखल्या आहेत. त्याचा मराठी माणसांनी फायदा घ्यावा आणि महाराष्ट्राला औद्योगिकदृष्टय़ा वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन देसाई यांनी केले. करोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी भूखंड, रस्ते आदी सुविधा सज्ज आहेत. एमआयडीसीने या आणि उद्योग सुरू करा, ही संकल्पना राबविण्यासाठी नवीन उद्योगांसाठी तयार शेड तयार करण्याचाही निर्णय घेतला आहे. गुंतवणुकदार यंत्र-सामुग्री आणून थेट उत्पादन सुरू करू शकतील. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना पद्धत सुरू केली आहे. मोठय़ा गुंतवणुकदारांसाठी उद्योगमित्र संकल्पना हाती घेतली आहे. उद्योग विभागाचा एक अधिकारी गुंतवणुकदारांसह पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू होईपर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे. आता गुंतवणुकदारांनी उद्योग सुरू करावेत, असे आवाहन देसाई यांनी केले. ‘कामगार विनिमय ब्युरो’ स्थापणार उद्योगांत कामागारांची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी ‘कामगार विनिमय ब्युरो’ स्थापन केला जाणार आहे. यावर लवकरच बैठक होईल. कामगारंची नोंदणी करून गरजेनुसार उद्योगांना कामागारांचा पुरवठा केला जाईल. यावेळी अल्पकालिन प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात येईल. महाराष्ट्रात कामगारांची टंचाई भासणार नाही, याची शासन काळजी घेत आहे. याशिवाय असंघटित क्षेत्र व कामगारांना शासन मदत करण्यास तयार आहे, असेही उद्योगमंत्री देसाई म्हणाले.