विरोधी पक्षनेते फडणवीस यांची टीका

सावंतवाडी : शिवसेना आणि सरकारला भरभरून देणाऱ्या कोकणच्या तोंडाला संकट काळात मुख्यमंत्र्यांनी पाने पुसण्याचेच काम केले आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले, मात्र चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोललेच नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.

निसर्ग वादळात अनेक घोषणा झाल्या, मात्र आपदग्रस्तांच्या हाती काही आले नाही. हेक्टरी पैसे दिल्याने ५००रु प्रतिझाड एवढीच मदत शेतकऱ्यांना मिळाली. ही एक प्रकारे कोकणवासीयांची थट्टाच असल्याची टीका फडणवीस यांनी मालवण आचरा येथे केली. फडणवीस यांनी देवगड आणि मालवणचा पाहणी दौरा केला.

शेतकरी मच्छीमार यांना उभे करायचे असेल तर कर्जमाफी आणि भरघोस मदत त्यांना मिळाली पाहिजे. यासाठी या पाहणी दौऱ्यातून सरकार आणि सरकारी यंत्रणेला जागे करून त्यातून जास्तीत जास्त कोकणवासीयांना फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तौक्ते वादळाच्या पाश्र्वाभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आचरा येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी आचरा ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.