कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे सकाळी ६ वाजता रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कल्याणजवळ लोकलचे पाच डबे घसरल्याने खोळंबलेली वाहतूक केव्हापर्यंत पूर्ववत होईल, हे अद्याप मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नाही. काय पर्याय असू शकतात ? १. कल्याणहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलला अपघात झाला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आता हळूहळू अप मार्गावरील वाहतूक सुरळीत होते आहे. त्यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या लोकल गाड्या सुरू झाल्या आहेत. २. सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीएसटीकडे येणाऱ्या लोकांचा त्रास थोडा कमी झाला आहे. याशिवाय कल्याणच्या पुढे राहणाऱ्या लोकांना रिक्षा किंवा बसच्या माध्यमातून कल्याणला येता येईल. कल्याणकडून सीएसटीला येण्यासाठी लोकल पकडता येऊ शकते. ३. अप मार्गावरील म्हणजेच सीएसटीकडे येणारी वाहतूक हळूहळू पूर्ववत होत आहे. मात्र डाऊन मार्गावरील म्हणजेच अंबरनाथ बदलापूरला जाणारी वाहतूक अद्याप बंदच आहे. लोकलचे घसरलेले डबे बाजूला काढण्याचे काम सुरू असल्याने बदलापूर-अंबरनाथला जाण्यासाठी रस्ते वाहतुकीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अधिक बस गाड्या सुरू केल्या आहेत. पुण्याहून मुंबईला किंवा मुंबईहून पुण्याला जायचे असल्यास काय पर्याय ? पुण्याहून जाणाऱ्या काही रेल्वे रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याला व पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत. परंतु या प्रवशांनी राज्य परिवहन महामंडळाचा पर्याय स्वीकारल्यास त्यांचा प्रवास सोयीस्कर होऊ शकतो. शिवनेरी, एशियाड व इतर खासगी सेवांचा वापर करून प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाता येईल.