नव्या शैक्षणिक वर्षांपासून पुस्तकेही बदलणार मुंबई : अकरावी-बारावीला तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनासाठीच्या गुणांची खिरापत आता बंद होणार असून प्रात्यक्षिके असलेले विषय वगळता सर्व विषयांची शंभर गुणांची परीक्षा होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून अकरावीची पुस्तकेही बदलणार आहेत. दहावीला तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण रद्द केल्यावरून पालक आणि शिक्षकांची कुरबुर अगदी परीक्षेच्या तोंडावरही सुरू असताना आता येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०१९-२०) अकरावी आणि बारावीचेही अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बंद करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी दहावीची पुस्तके बदलल्यानंतर यंदा अकरावीची पुस्तके आणि मूल्यांकन प्रणालीत बदल करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी (२०२०-२१) बारावीसाठी हे बदल लागू होतील. अंतर्गत मूल्यपान बंद केल्यामुळे प्रवेशाच्या स्पर्धेत विद्यार्थी मागे पडतील अशी ओरड शिक्षक आणि पालकांकडून दहावीच्या तोंडी परीक्षा बंद केल्यानंतर करण्यात आली. मात्र त्याचवेळी अंतर्गत मूल्यमापनात शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडून सढळ हाताने गुण दिले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांची नेमकी पारख होत नाही, असाही आक्षेप फुगलेल्या निकालानंतर दरवर्षी घेण्यात येतो. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आता कनिष्ठ महाविद्यालयांच्या तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अकरावी आणि बारावीला सध्या ८०-२० अशी मूल्यांकन प्रणाली आहे. कला, वाणिज्य शाखेच्या बहुतेक विषयांना वीस गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतात, तर ८० गुणांची लेखी परीक्षा होते. सर्व भाषा विषयांची तोंडी परीक्षा घेण्यात येते, त्यासाठीही २० गुण असतात. आता भाषा, वाणिज्य शाखेचे विषय आणि कला शाखेचे बहुतेक साऱ्या विषयांची शंभर गुणांची अंतिम परीक्षा होणार आहे. परीक्षेतील शेवटचा प्रश्न हा सिद्धांताच्या उपयोजनावर, विद्यार्थ्यांच्या अनुभवावर, कृतीवर आधारित असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अधिक आव्हानात्मक होणार आहेत. विज्ञान शाखेतील विषय आणि भूगोल, मानसशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा कायम असतील, अशी माहिती अभ्यास मंडळातील सदस्यांनी दिली.