मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक भरतीमधील घोटाळ्याची कागदपत्रे सभागृह नेत्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सादर केल्यामुळे अतिरिक्त आयुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले.पालिकेच्या सुरक्षा रक्षक दलामध्ये ९५० सुरक्षा रक्षकांची भरतीत उमेदवारांनी केलेले अर्ज आणि त्यांचा चाचणी अहवाल यात तफावत आढळून आली असून यावरून उमेदवारांसाठी वेगळ्याच व्यक्तींनी चाचणी दिल्याचे उघड झाले आहे. तसेच उमेदवाराचा अर्ज आणि त्याच्या चाचणी अहवालावर वेगळ्याचे व्यक्तीचे छायाचित्र चिकटविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान १० अधिकाऱ्यांची भांडूप कॉम्प्लेक्समध्ये नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणाला ‘लोकसत्ता’मधून वाचा फोडण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी यापूर्वी केली होती. त्यावेळी असा घोटाळा झालाच नाही, असे उत्तर अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिले होते.सुरक्षा रक्षक भरती घोटाळ्यातील कागदपत्रे सभागृह नेते यशोधर फणसे यांनी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि श्रीनिवास यांच्याकडे सादर केली. या कागदपत्रांवरून घोटाळा झाल्याचे सिद्ध होत असून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे आणि भरती प्रक्रियेतील सर्व कागदपत्रे ताब्यात घ्यावीत. अन्यथा कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे, असे मत फणसे यांनी व्यक्त केले.