ट्रेन सुरु होणार या ही अफवा कोणी पसरवली त्याबद्दलचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी चौकशी करुन अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. मुंबईतील वांद्रे भागात आज हजारो मजुरांचा जमाव जमला होता. लॉकडाउन वाढवला तरीही ट्रेन सुरु होतील अशी आशा त्यांना होती. त्यामागचे कारण ही अफवा होती. या अफवेमुळेच सगळा जमाव जमला होता. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करण्यात आला. आता ही अफवा कुणी पसरवली त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

करोनाचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. मात्र आज मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर ट्रेन सुटेल आणि आपल्याला घरी जायला मिळेल या आशेने हजारो लोकांचा जमाव जमा झाला होता. या जमावला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही परप्रांतीयांनी घाबरु नये तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात असं म्हटलं आहे. तसंच लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

जेव्हा मुंबईत ही घटना घडली तेव्हा आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं. मात्र कुणीही राजकारण करु नये असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पोलिसांनी या सगळ्या जमावाला समजावलं. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या सगळ्या कामगारांची समजूत घातली. त्यानंतर हे सगळे कामगार घरी गेले. या सगळ्या प्रकरणाबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही उद्धव ठाकरेंना फोन करुन जाणून घेतली. आता या प्रकरणी ज्या कुणी अफवा पसरवली असेल त्याची चौकशी होऊन कारवाई होणार आहे असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.