मनुवाद्यांमुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान होतो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर निवेदन देत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणतात मनुवादी लोक हिंदूंना बदनाम करत आहेत. शिव्या देणे, दुसऱ्यांवर आरोप करणे ही यांची संस्कृती आहे. पारंपारिक हिंदू संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम हे लोक करत आहेत. यांच्यामुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

वैभव राऊतला पकडल्यावर त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. उद्या असेच मोर्चे जर मुस्लिम बांधवांनी काढले आणि त्यात ‘देशका नेता कैसा हो’ सारख्या घोषणा दिल्या तर? हे असे होणार असेल तर आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला अजिबात वेळ लागणार नाही असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेजवरच्या निवेदनात त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचाही उल्लेख केला आहे. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी हे सचिन अंदुरेपर्यंत पोहचले आहेत. त्यांचे अभिनंदन करतो मात्र या विवेकवादी लोकांना मारणाऱ्यांचे हात शोधलेत आता यामागचे बाप अर्थात सूत्रधार कोण आहेत तेदेखील शोधा असेही आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. तसेच या लोकांनी विवेकवादी लोकांनाच ठार का केले? पाकिस्तानात जाऊन झकीर उर रहमान लख्वीला किंवा हाफिज सईदला गोळ्या घालण्याची हिंमत यांनी का दाखवली नाही असा प्रतिप्रश्नही आव्हाड यांनी आपल्या साडेचार मिनिटांच्या निवेदनात विचारला आहे.

२००२-२००३ च्या दरम्यान हिमांशू पानसे या मनुवादी कार्यकर्त्याच्या घरी पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्याबद्दल खंत व्यक्त केली ती सुनील जोशीने जो पुढे मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी म्हणून सापडला. मी त्या दिवसापासून हे सांगतो आहे की मनुवाद्यांपासून देशाला धोका आहे. अतिरेकी मुस्लिम असो की हिंदू असो अतिरेकी अतिरेकीच असतो, देशाचा शत्रूच असतो. फक्त ते हिंदू आहेत किंवा मनुवादी आहेत म्हणून त्यांच्या विरोधात कमी बोलणे हे न्यायाला धरून नाही असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.मडगावचा बॉम्ब स्फोट असो, मिरजेची दंगल असो किंवा जोधा अकबरचे प्रकरण असो यामागे कोणाकोणाचे हात आहेत? संविधान, कायदा यांना न घाबरणारे टोळके तयार करण्याचे काम सुरू आहे असाही आरोप आव्हाड यांनी केला.