तीन महिन्यांपासून बसणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यांनी पालघर जिल्ह्य़ातील डहाणू आणि तलासरी तालुके हादरले असून नागरिकांचा भीतीने थरकाप उडाला आहे. भूकंपाचे लहान धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आज शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याता पुन्हा भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. आज झालेल्या भूकंपाची तीव्रता गेल्या तीन महिन्यातील धक्क्यांपेक्षा मोठी आहे. या भूकंपाची तीव्रता गुजरात सीमेवरील उंबरगावपर्यंत जाणवली आहे. बोईसर औद्योगिक वसाहती बरोबरच अणू ऊर्जा प्रकल्पात देखील जाणवले. या भूकंपामुळे डहाणू व तलासरी तालुक्यातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. ठाण्यातदेखील भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची तक्रार ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आली. दरम्यान, दोन फेब्रुवारी रोजी पालघर परिसरात मोठय़ा भूकंपाची शक्यता नसल्याचे भूकंपतज्ज्ञ अरुण बापट यांनी सांगितले होते.