सचिन वाझे आणि मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यातील भेटींवर शंका उपस्थित करत काँग्रेसने काही सवाल केले आहेत. “वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंह यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंह यांच्या कार्यालयातीलच आहे,” असं काँग्रेसने सिंह यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

काँग्रसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी वाझे आणि परमबीस सिंह प्रकरणावरून भाजपाला प्रत्युत्तर दिलं. “रश्मी शुक्ला या फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी आहेत, हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी पदाचा दुरूपयोग करण्यापर्यंत मजल जाते. त्यांनी आपण माफी मागितल्याची माहिती फडणवीसांना दिली नसेल का? परमबीर सिंह यांच्याकडून दुसरीकडे लक्ष घेऊन जायचं होतं का? याच उत्तर यातून मिळतं. सबळ पुरावा द्यायचा असेल, तर दोन व्यक्तीच्या संभाषणाची रेकॉर्डिंग द्यायला हवी. ती तर दिली नाही. पण ऐकीव माहिती आधारे, निकवर्तींयांकडून असा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला,” असा आरोप सावंत यांनी केला आहे.

“अर्णब गोस्वामी प्रकरणामध्ये परबीर सिंह यांना पंतप्रधानांनी आपल्या अधिकारात बडतर्फ करावं. कलम ३११चा वापर करून बडतर्फ करण्याची मागणी भाजपाने केली होती. अचानक परमबीर सिंह हे लगेचच प्रिय झाले. भाजपाला विश्वासार्ह वाटायला लागले. यावर न्यायिक चौकशी नेमली आहे. त्यातून सत्य समोर येईल. सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात बऱ्याच गोष्टी दडलेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंह हे असं सांगत आहेत की, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस वाझे गृहमंत्र्यांना भेटले. प्रश्न असा आहे की, २५ तारखेला अँटिलियाजवळ घटना घडली. त्या वेळी सचिन वाझे कुणाला भेटत होते. या प्रश्नाच्या उत्तरातच सगळं दडलेलं आहे,” असं सावंत म्हणाले.

सिंह म्हणतात की, वाझे आणि गृहमंत्री यांची भेट झाली. आणि वाझेंनी आयुक्तांकडे तक्रार केली. एक एपीआय पोलीस आयुक्तांना जाऊन गृहमंत्र्यांची तक्रार करतो, याचा अर्थ काय होतो? वाझेंच्या कोण जवळ आहे. एपीआय दर्जाचा अधिकारी एकापेक्षा अधिकवेळा पोलीस आयुक्तांना भेटला. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंह यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंह यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंह यांच्या कार्यालयाच्या १०० फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंह यांच्या कार्यालयातीलच आहे. तसेच वाझे वारंवार सिंह यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणात एनआयए सिंह यांची चौकशी का करत नाही? सिंह यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? सिंह यांची अटक टाळण्यात येत आहे का? वाझेंसारखा अधिकारी हे सर्व प्रकरण घडवून आणूच शकत नाही. अँटिलिया प्रकरण घडण्यापूर्वी वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं, त्याचा तपास व्हावा, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.