मुंबईबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि प्रतिबंधात्मक नियम धुडकावून शहरात ठिकठिकाणी होणारी गर्दी यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबईत दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात ४०० होती. फेब्रुवारीपासून यात पुन्हा वाढ झाल्याचे आकडेवारीत दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही संख्या पुन्हा पाचशेपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवडय़ापेक्षा या आठवडय़ात निश्चितच रुग्णांची संख्या चारशे ते पाचशेने वाढली आहे.

लोकलमुळे रुग्णसंख्या वाढल्याची शक्यता कमी आहे. लगेचच टाळेबंदी करणे आवश्यक नाही, परंतु रुग्णवाढीकडे आत्ताच गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पालिकेनेही एका रुग्णामागे संपर्कात आलेल्यांचा अधिकाधिक शोध घेणे, चाचण्यांवर भर देणे गरजेचे असल्याचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

परदेशातून आणि इतर जिल्ह्य़ांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. नियमित विभागवार केलेल्या चाचण्या बंद झाल्या आहेत. आत्ता झोपडपट्टीतील रुग्णसंख्या कमीच असून आता आढळलेले रुग्ण हे गृहनिर्माण संकुलातील आहेत. त्यातही अधिक रुग्णांचे निदान हे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि पालिकेच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागांमध्ये केले जाते. त्यात प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही योग्य रीतीने केले जात नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगत मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

जोखमीच्या गटातल्यांनी विशेष काळजी

रुग्णसंख्या वाढली असली तरी योग्य उपचारांमुळे त्या तुलनेत मृतांची संख्या वाढलेली नाही. जोखमीच्या गटातल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ.अविनाश सुपे यांनी अधोरेखित केले.

मुंबईत ४६१ नवे रुग्ण

मुंबईतील रुग्णवाढीचा दर मंगळवारी आणखी वाढला असून आता हा दर ०.१६ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या आठवडय़ाभरात हा दर ०.१२ टक्के होता. मंगळवारी ४६१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.  मुंबईत एकू ण बाधितांची संख्या ३,१५,०३० झाली आहे. तर एका दिवसात ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत २ लाख ९७ हजारांहून अधिक रुग्ण म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी घसरून ४४५ दिवसांवर आला आहे. आतापर्यंत एकू ण ३० लाख ३९ हजार चाचण्या करण्यात आल्या असून सध्या ७६ झोपडपट्टय़ा व चाळी प्रतिबंधित आहेत. त्यातील सर्वाधिक घाटकोपर व भांडुपमध्ये आहेत.

मुलुंड आणि चेंबूरमध्ये अधिक बाधित

चेंबूरचा भाग असलेल्या एम पश्चिममध्ये आणि मुलुंडचा भाग असलेल्या टी विभागात रुग्णवाढीचा दर ०.२६ टक्के झाला आहे. चेंबूरमध्ये सरासरी २० रुग्ण आढळत असून मुलुंडमध्ये दररोज सरासरी ४० रुग्ण आढळत आहेत.