कोरेगाव भीमा दंगलीच्या तपास प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात काही व्यक्ती आणि संघटनांवर आरोप करणे सुरु केले आहे. या दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयावरही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या जबाबदार नेत्यांनी टीका केली आहे. मात्र या याप्रकरणी तपास करणाऱ्या चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या शपथपत्रात मात्र पवार यांनी आपण या संदर्भात कोणा व्यक्ती अथवा संघटनेवर आरोप करू इच्छित नाही असे स्पष्टपणे नमूद केले होते, असे भांडारी यांनी म्हटले आहे. तसेच, आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पवारांची भूमिका अचानक बदलली आणि ते व त्यांच्या पक्षाचे नेते काही व्यक्ती व संघटनांवर आरोप करू लागले आहेत, हे आश्चर्यजनक असल्याचेही भांडारी यांनी सांगितले आहे.

या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे (एसआयटी) सोपवावा, अशी मागणी पवार यांनी केली होती. सध्या हा तपास राज्य पोलिसच करत आहेत, हेच पवार या घटनेची चौकशी एनआयएकडे सोपविण्याचा केंद्राच्या निर्णयावरही टीका करत आहेत, मग पवार यांचा नेमका विश्वास आहे तरी कोणावर? असा सवालही भांडारी यांनी उपस्थित केला. याचबरोबर याच शपथपत्रात पवार यांनी समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती, याकडेही भांडारी यांनी लक्ष वेधले.