एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिवाळीपूर्वी देण्याकरिता प्रसंगी मालमत्ता तारण ठेवून कर्ज काढण्याची तयारी महामंडळाने सुरू केल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी जाहीर केले. दरवर्षी दिवाळीत करण्यात येणारी भाडेवाढ यंदा होणार नसल्याची दिलासादायक बातमीही परब यांनी लाखो एसटी प्रवाशांना दिली आहे.

टाळेबंदीमुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीचे उत्पन्न घटले. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारदेखील देणे अशक्य झाले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि एसटीच्या दैनंदिन खर्चासाठी एकूण ३६०० कोटी रुपयांची मागणी महामंडळाने राज्य शासनाकडे केली. परंतु शासनाचेदेखील उत्पन्न घटल्यामुळे केवळ शासनावर अवलंबून न राहाता इतर पर्यायांची चाचपणी महामंडळ करत आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार देणे ही प्राथमिकता असून, त्यासाठी दर महिन्याला २९२ कोटी रुपयांची आवश्यकता महामंडळाला आहे. एसटीला मिळणारे दैनंदिन २२ कोटी रुपयांचे उत्पन्न टाळेबंदीकाळात पूर्णपणे बंद होते. सध्या हे उत्पन्न ५ ते ६ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले असून त्यासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शिवाय इतरही खर्च असल्याने जवळपास २ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तयारी एसटी महामंडळ करत आहे.

उत्पन्न वाढविण्यासाठी..

या परिस्थितीत महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियमित कामकाजासोबत मालवाहतूक, टायर रिमोल्डिंग, एसटी पेट्रोल पंपावर इतर वाहनांना इंधन विक्री यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम व नि:स्वार्थ सेवा भावामुळे अल्प कालावधीतच महामंडळाची परिस्थिती सुधारेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.

प्रक्रिया काय?

* संपूर्ण टाळेबंदी काळात एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावत होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी त्यांचे पगार देणे हीच प्राथमिकता असून दुर्दैवाने महामंडळाला कर्ज काढावे लागेल.

* अशाप्रकारे कर्ज घेताना कायदेशीर बाबी तसेच कर्ज परतफेडीची क्षमता तपासली जाते. महामंडळाकडील स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन करून त्यानुसार एखादी संस्था कर्ज देत असते.

* मालमत्ता तारण ठेवणे ही संकल्पना वेगळी असून त्यासाठी प्रत्यक्ष मालमत्तेचे हस्तांतरण होत नसते तर महामंडळाची परतफेडीची क्षमता म्हणून ग्राह्य़ धरले जाते, अशी माहिती परिवहनमंत्र्यांनी दिली.