एका जिल्ह््यातून अन्य जिल्ह््यात प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता नाही. मात्र प्रवास करण्याचे वैध कारण प्रवाशांकडे हवे, अशी माहिती बुधवारी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली.

गेल्या वर्षीच्या टाळेबंदीत पोलिसांच्या ई-पासशिवाय राज्यांतर्गत, राज्याबाहेरील प्रवास करता येत नसे. यंदा राज्य सरकारला ई-पास पद्धत लागू न करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. सरकारने ती मान्य केल्याचे पांडे यांनी सांगितले.

त्याशिवाय अत्यावश्यक सेवांशी संबंधित व्यक्ती आणि अत्यावश्यक कामांसाठी नागरिक प्रवास करू शकतील, मात्र प्रवासासाठी त्यांच्याकडे वैध कारण आवश्यक असेल. त्याची झाडाझडती सर्वत्र होईल. तसेच विनाकारण प्रवास करणाऱ्या किंवा घराबाहेर पडणाऱ्यांवर मात्र कारवाई के ली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ८१ टक्के  लसीकरण पूर्ण

पोलीस दलातील ८१ टक्के  अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ४० टक्के  दुसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती पांडे यांनी दिली.

दोन लाख पोलीस रस्त्यावर

बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या कठोर निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी राज्य पोलीस दलातील सुमारे दोन लाख पोलीस मनुष्यबळ रस्त्यांवर असेल. गृहरक्षक दलाचे १३ हजार जवान, राज्य राखीव दलाच्या २२ तुकड्यांची अतिरिक्त कु  मक बंदोबस्तासाठी तैनात असेल, असे पांडे यांनी सांगितले.

५० वर्षांपुढील पोलिसांना घरी राहण्याचा सल्ला

५० वर्षांपेक्षा जास्त वय आणि सहव्याधी जडलेल्या पोलिसांना घरीच राहाण्याचा सल्ला दिल्याचे पांडे यांनी स्पष्ट के ले. गेल्या वर्षी  ५५ वर्षांपुढील अंमलदारांना तसे आदेश देण्यात आले होते. करोना काळात राज्य पोलीस दलातील ३६७२८ अधिकारी, अंमलदार (मुंबई आयुक्तालय वगळता) बाधित झाले. त्यातील ३१६० उपचार घेत आहेत. उर्वरित ३३ हजार पोलीस बरे होऊन कर्तव्यावर रुजू झाले, तर ३७३ जणांचा मृत्यू झाला.

तीन लाखांवर गुन्हे  : करोना काळात  निर्बंध मोडणाऱ्या तीन लाख २३ हजार जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले. ९० कोटी ४७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ४७ हजारांहून अधिक व्यक्तींना अटक झाली तर एक लाखांहून अधिक वाहने जप्त करण्यात आली.