मुंबईजवळच्या आसनगावनजीक असलेला माहुली गड कसलेल्या गिर्यारोहकांची देखील दमछाक करणारा आहे. पण हा गड एका दिव्यांगांच्या गटाने अवघ्या ६ तासांत सर केला असं जर कुणी सांगितलं, तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे घडलंय. मुंबईच्या अँटॉप हिल येथील दिव्यांग जीवनदीप ऑल इंडिया फाउंडेशनच्या ३८ दिव्यांग सदस्यांनी फक्त सहा तासात माहुली किल्ला सर केला आहे. यामध्ये काही अंध तरुणींचाही समावेश होता. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी एका किल्ल्याला भेट देऊन ट्रेक करण्याचा मुंबईच्या अँटॉप हिलच्या दिव्यांग जीवनदीप ऑल इंडिया फाउंडेशनच्या दिव्यांगांचा संकल्प आहे. आतापर्यंत नऊ किल्ल्यांना भेट दिलेल्या या दिव्यांगांनी दहाव्या वेळी माहुली किल्ल्यावर गिर्यारोहण केले आहे. २५ ते ३० वयोगटातील व्यक्तींचा समावेश या किल्यावर गिर्यारोहकांची कायम भ्रमंती असते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर माहुली किल्ला सर करण्यासाठी मुंबईच्या दिव्यांग जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष जीवन मराठे, सचिव गिरीश पटेल, शहनाझ शेख यांसह २५ ते ३० वयोगटातील ३८ अंध व्यक्ती किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. आणि त्यांनी किल्ला सर केला. सकाळी ११ वाजता या गटाने गडावर चढाई करण्यास सुरुवात केली आणि सायंकाळी पाच वाजता पायथा गाठला. या दिव्यांग तरुण-तरुणींना सोबत्यांसह काठीचा आधार घेऊन गड पार करताना पाहुन सर्वच अवाक् झाले. निसर्ग डोळ्यांनी टिपता येत नसला तरी आजूबाजूच्या जंगलाची चाहूल घेत अगदी चौकसपणे अंध व्यक्तींनी किल्ल्यावर चढाई आणि उतराई सुद्धा केली. या दरम्यान येथील वनस्पती, विषारी–बिनविषारी सर्प, पक्षी, प्राणी आदी घटकांची माहिती घेत अभ्यासही केला.